२० लाख झोपड्यांचा पुनर्विकास; १० लाख परवडणारी घरे देणार; महामुंबईसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्पामधून मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 05:36 IST2026-03-07T05:36:31+5:302026-03-07T05:36:48+5:30

Maharashtra Budget 2026: मुंबईत ३० लाख घरे, 'चौथी मुंबई'ची निर्मिती आणि मेट्रो-११ प्रकल्पासाठी हजारो कोटींची तरतूद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात मांडलेला मुंबईच्या विकासाचा संपूर्ण आराखडा वाचा.

Maharashtra Budget: Redevelopment of 20 lakh slums; 10 lakh affordable houses to be provided; Chief Minister Devendra Fadnavis' big announcement for Mahamumbai in the budget | २० लाख झोपड्यांचा पुनर्विकास; १० लाख परवडणारी घरे देणार; महामुंबईसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्पामधून मोठी घोषणा

२० लाख झोपड्यांचा पुनर्विकास; १० लाख परवडणारी घरे देणार; महामुंबईसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्पामधून मोठी घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशात २० लाख झोपड्यांचा पुनर्विकास, तर १० लाख परवडणारी घरे उभारली जातील. नवीन झोपडी होऊ नये म्हणून जीआयएस आधारित मॅपिंगचा वापर करुन ‘नो न्यू स्लम फ्रेमवर्क’प्रणाली विकसित करून ती पुढे इतर शहरांतदेखील लागू केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली.

मुंबई- वाढवण द्रुतगती मार्गाच्या जोडणीसाठी उत्तन ते विरार या ५८ हजार ७५४ कोटी रुपये किमतीच्या सागरी सेतूचे काम हाती घेण्यात आले आहे, तसेच अटल सेतूला नवी मुंबई विमानतळाला जोडण्यासाठी जुलै २०२६ पर्यंत उलवे किनारी मार्गाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

वाढवणजवळ चौथी मुंबई
अटल सेतू परिसरात ‘तिसरी मुंबई’, तर पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर परिसरात ‘चौथी मुंबई’ विकसित करण्यात येईल, असे सांगतानाच महामुंबईची अर्थव्यवस्था २०३० पर्यंत १४० अब्ज डॉलरवरून ३०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढविण्याचे प्रस्तावित असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प २०२८ पर्यंत पूर्ण करणार
मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गातील ठाणे ते तलासरी ३ स्थानकांचे काम फेब्रुवारी २०२६ अखेर पूर्ण होईल. विरार, बोईसर व ठाणे या बुलेट ट्रेन स्थानकाभोवतीच्या क्षेत्राच्या विकासाचा बृहत् आराखडा तयार केला जाईल,  तर मुंबईतील ऑरेंज गेट, पूर्व मुक्तमार्ग ते मरिन ड्राइव्हदरम्यान भुयारी मार्ग प्रकल्प डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

वाहतुकीवर भुयारी,  मेट्रोचा उतारा
मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी भुयारी मार्ग, उन्नत मार्ग व मेट्रो प्रकल्प डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. शिवडी–वरळी उन्नत मार्ग सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करणार. ऐरोली ते कटाई नका या उन्नत मार्ग - ३ चे काम हाती घेतले आहे. उत्तन ते विरारदरम्यान ५८ हजार ७५४ कोटी रुपये खर्चून सागरी सेतू उभारण्याची योजना आहे.

कोणत्या प्रकल्पासाठी किती निधी?
वडाळ्यात जागतिक दर्जाच्या स्टार्ट अप व इनोव्हेशन हब १३० एकर जमीन वाटप 
वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो-११ भूमिगत प्रकल्प - २३,४८७ कोटी 
मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो ८ - २२,८६२ कोटी
तळोजा ते खांदेश्वर नवी मुंबई मेट्रो २ - ५,५७५ कोटी

हे मार्ग पूर्ण करण्याचे नियोजन 
मार्ग ; प्रकल्पाची किंमत (कोटी) :  कधी पूर्ण होणार   
ठाणे - बोरिवली मार्ग : १८ हजार ८३८ : जून २०२८ 
खारघर / तुर्भे : २ हजार १०० : सप्टेंबर २०२८ 
अटल सेतू ते मुंबई - पुणे द्रुतगती महामार्ग : १ हजार १०२ : फेब्रुवारी २०२७ 
स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतू : १८ हजार १२१ : मे २०२८ 
वर्सोवा / भाईंदर मार्ग : २२ हजार १६६ : डिसेंबर २०२८ 
पनवेल ते कर्जत उपनगरीय रेल्वे : २ हजार ७८२ : काम अंतिम टप्प्यात
बाळकूम ते गायमुख किनारी रस्ता प्रकल्प : डिसेंबर २०२८ 
उलवे किनारी मार्ग : जुलै २०२६ 
शिवडी ते वरळी उन्नत मार्ग : सप्टेंबर २०२६ 
छेडा नगर ते आनंदनगर / साकेत - डिसेंबर २०२८

Web Title: Maharashtra Budget: Redevelopment of 20 lakh slums; 10 lakh affordable houses to be provided; Chief Minister Devendra Fadnavis' big announcement for Mahamumbai in the budget