महाराष्ट्रात बुलेट ट्रेनचे काम कधी होणार?; CM फडणवीसांची मोठी माहिती, ४ रेल्वे कॉरिडॉर मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 16:21 IST2026-03-06T16:20:29+5:302026-03-06T16:21:47+5:30
CM Devendra Fadnavis On Maharashtra Bullet Train: अर्थसंकल्प सादर करताना, बुलेट ट्रेन प्रकल्प, रेल्वे कॉरिडॉर याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती देण्यात आली.

महाराष्ट्रात बुलेट ट्रेनचे काम कधी होणार?; CM फडणवीसांची मोठी माहिती, ४ रेल्वे कॉरिडॉर मंजूर
CM Devendra Fadnavis On Maharashtra Bullet Train: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित बुलेट ट्रेनबाबत देशभरात चर्चा सुरू आहे. मुंबई आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. गुजरातमधील या मार्गाचे काम जलदगतीने सुरू असून, लवकरच पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले जाणार आहे. महाराष्ट्रात बुलेट ट्रेनची कामे कधीपर्यंत होणार, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. यावेळी बुलेट ट्रेन प्रकल्प, रेल्वे कॉरिडॉर याबाबत माहिती देण्यात आली.
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गातील ठाणे ते तलासरी मार्गातील तीन स्थानकांचे काम सन २०२७ अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाद्वारे निर्माण होण्याच्या आर्थिक मूल्यांचा फायदा घेण्यासाठी विरार, बोईसर आणि ठाणे बुलेट ट्रेन स्थानकाच्या भोवतीच्या क्षेत्राच्या विकासाकरिता आराखडा तयार करण्यात येईल.
औद्योगिक पट्ट्याला थेट लाभ होईल
मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ ब या १४ हजार ९०७ कोटी रुपये किमतीच्या कामास मान्यता देण्यात आली असून, त्यात राज्य शासनाचा ५० टक्के आर्थिक सहभाग आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत बदलापूर-कर्जत, आसनगाव ते कसारा, पनवेल ते वसई या दरम्यान सुमारे ६९ किमीचे नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर प्रस्तावित आहेत. पुणे-लोणावळा ३ आणि ४ मार्गिकेच्या ५ हजार १०० कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाचा पिंपरी चिंचवड आणि आकुर्डी, तळेगाव या औद्योगिक पट्ट्याला थेट लाभ होईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
दरम्यान, बुलेट ट्रेनमुळे मुंबईहून अहमदाबाद हे अंतर केवळ २ तास ७ मिनिटांत कापता येणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दर ३० मिनिटांनी ट्रेन पकडता येणार आहे. बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा सुरत ते बिलिमोरा असणार आहे. त्यानंतर वापी ते सुरत हा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यावर वापी ते अहमदाबाद मार्ग सुरू होईल. हे सगळे मार्ग प्रवासी सेवेत आल्यावर ठाणे ते अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन धावेल. तर, सगळ्यात शेवटी मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू होईल. बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा १५ ऑगस्ट २०२७ रोजी प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचे सांगितले जात आहे.