Join us  

'केंद्र सरकारने केलेल्या 'या' घोषणांचा महाराष्ट्र सर्वात मोठा लाभार्थी' 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 1:32 PM

अमेरिकेत आणि चीनमध्ये चाललेल्या ट्रेड वॉरमुळे ज्या कंपनी स्थलांतरित होत आहेत. त्या भारतात येण्याची शक्यता आहे. मात्र या कंपन्या भारतात येण्यासाठी 30 टक्के कॉर्पोरेट टॅक्सचा अडसर होता तो दूर झाला.

मुंबई - कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी घोषित केला. या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. जागतिक स्थितीचा परिणाम भारतावर होऊ नये, ट्रेड वॉरचा फायदा भारताला मिळावा यासाठी केलेल्या केंद्राने उचलेलं हे पाऊल महाराष्ट्रासाठी फायदेशीर ठरणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यात ते म्हणाले की, कॉर्पोरेट टॅक्स 22 टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा निर्णय महत्वाचा आहे. अमेरिकेत आणि चीनमध्ये चाललेल्या ट्रेड वॉरमुळे ज्या कंपनी स्थलांतरित होत आहेत. त्या भारतात येण्याची शक्यता आहे. मात्र या कंपन्या भारतात येण्यासाठी 30 टक्के कॉर्पोरेट टॅक्सचा अडसर होता तो दूर झाला. 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्यासाठी कॉर्पोरेट टॅक्स कमी करणे गरजेचे आहे असं अनेक अर्थतज्ज्ञ सांगतात. भारताने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असं सांगून त्यांनी केंद्राच्या निर्णयाचं स्वागत केलं. 

तसेच कॉर्पोरेट टॅक्स कमी केल्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढणार आहे. देशाचं मॅन्युफॅक्चरिंग हब महाराष्ट्रात आहे. त्यामुळे केंद्राच्या या निर्णयाचा फायदा सर्वाधिक जास्त महाराष्ट्राला होणार आहे. महाराष्ट्रात अनेक जागतिक कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. तसेच टॅक्स कमी झाल्यामुळे वाचलेले पैसे पुन्हा गुंतवणूक करण्यासाठी वापर करता येईल. कंपन्याची गुणवत्ता आणि बाजारात मागणी वाढेल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

दरम्यान, नवीन गुंतवणुकीला 15 टक्के कॉर्पोरेट टॅक्सचा लावण्याचा निर्णय अतिशय योग्य आहे. या निर्णयामुळे उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक निर्माण होणार आहे. नवीन सरकार आल्यानंतर सातत्याने गुंतवणुकीचा निर्णय असो वा बँकांचे विलीनीकरण असे अनेक महत्वाचे निर्णय घेतले.  रेपो रेट कमी करण्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे, केंद्र सरकारच्या अनेक निर्णयामुळे महाराष्ट्राला फायदा झाला आहे असं सांगत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निर्मला सितारामन यांचे आभार मानले

योग्य वेळी युतीचा निर्णय घेऊगेल्या काही दिवसांपासून युतीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. पत्रकारांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रश्न विचारला त्यावर ते म्हणाले, युतीची तुमच्या प्रमाणे मलाही चिंता आहे, योग्य वेळी योग्य निर्णय घोषित करु असं सांगत मुख्यमंत्र्यांनी युतीबाबत सस्पेन्स वाढविला आहे. तसेच नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाबाबतही मुख्यमंत्र्यांनी लवकरच निर्णय घेऊ सांगितले आहे.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसकेंद्र सरकारनरेंद्र मोदीनिर्मला सीतारामन