Join us  

Maharashtra Lockdown: राज्यातील लॉकडाऊनमध्ये पुन्हा वाढ होणार का?; राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 1:30 PM

Maharashtra Lockdown: राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारनं लागू केलेले कडक निर्बंध १५ मेपर्यंत वाढविण्यात आले आहेत. पण १५ मेनंतर निर्बंध उठणार का? याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

Maharashtra Lockdown: राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारनं लागू केलेले कडक निर्बंध १५ मेपर्यंत वाढविण्यात आले आहेत. पण १५ मेनंतर निर्बंध उठणार का? याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात अजूनही दैनंदिन पातळीवर ५० हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे परिस्थिती हवीतशी नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे राज्यात लागू असलेल्या निर्बंधांच्या कालावधीत आणखी काही दिवस वाढ करावी लागू शकते, असं विधान राजेश टोपे यांनी केलं आहे. 

राज्यात गेल्या २४ तासांत ५४ हजार २२ नवे रुग्ण आढळून आले होते. गेल्या काही दिवसांपासून राज्यतील नव्या कोरोना रुग्णवाढीची आकडेवारी ५० हजारांच्यावरच राहिलेली आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

"राज्यात रोज ५० हजारांच्यावरच रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट हवा तसा कमी झालेला नाही. राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी १२ जिल्ह्यांमध्ये दर कमी झाला आहे. पण परिस्थिती निवळलेली नाही. त्यामुळे निर्बंध काढून घेण्यात आले तर परिस्थिती पुन्हा एकदा हाताबाहेर जाऊ शकते.  काही जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढते आहे. लॉकडाऊनच्या निर्णयाबाबत १५ मेपर्यंत पुढील चित्र स्पष्ट होईल", असं राजेश टोपे म्हणाले आहेत. 

राज्य सरकार तिसऱ्या लाटेसाठी देखील तयारी करत असल्याचं टोपे यांनी सांगितलं. बेड्स वाढवणं, ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि इतर वैद्यकीय सुविधांमध्ये कशी वाढ करता येईल यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या दृष्टीनंही सरकार प्रयत्नशील आहे, असं टोपे म्हणाले.  

टॅग्स :राजेश टोपेमहाराष्ट्रकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस