उल्हासनगरला कमी दाबाने पाणी
By Admin | Updated: July 14, 2014 23:39 IST2014-07-14T23:39:00+5:302014-07-14T23:39:00+5:30
एमआयडीसीकडून शहराला कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा गेले तीन दिवस होत असल्याने कॅम्प नं- ४ व ५ विभागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे

उल्हासनगरला कमी दाबाने पाणी
उल्हासनगर : एमआयडीसीकडून शहराला कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा गेले तीन दिवस होत असल्याने कॅम्प नं- ४ व ५ विभागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांसह, नगरसेवकांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे.
उल्हासनगरला एमआयडीसीच्या शहाड व पाले जलकुंभातून दररोज १२० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. मात्र एमआयडीसी पालिकेला कोंडीत पकडून कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा करीत असल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला आहे. एमआयडीसीने आपल्या वर्तनात बदल केला नाही तर नागरिकांच्या सोयीसाठी शहाड पंपिंग स्टेशनच ताब्यात घेण्याचा इशारा यावेळी चौधरी यांनी दिला आहे.
शहरातील कॅम्प नं. १, २ व ३ परिसराला शहाड जलकुंभातून ७३ एमएलडी तर कॅम्प नं. ४ व ५ विभागाला पाले जलकुंभातून ३७ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. मात्र अलीकडे एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका शहरवासीयांना बसत असून एका पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ महिलांवर आली आहे. पालिकेला पूर्वसूचना न देता दुरस्तीचे काम केल्याने सलग तीन दिवस शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले आहे. (प्रतिनिधी)