लॉकडाऊनमुळे कंटाळवाणे वातावरण निर्माण झाले आहे - उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 06:44 IST2020-06-11T06:44:08+5:302020-06-11T06:44:47+5:30

पोलिसांवर हल्ला करणाऱ्या युवकाची जामिनावर सुटका

Lockdown has created a dull atmosphere - High Court | लॉकडाऊनमुळे कंटाळवाणे वातावरण निर्माण झाले आहे - उच्च न्यायालय

लॉकडाऊनमुळे कंटाळवाणे वातावरण निर्माण झाले आहे - उच्च न्यायालय

मुंबई : लॉकडाऊनमुळे अतिशय कंटाळवाणे व वैतागलेले वातावरण निर्माण झाले आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने पोलिसांवर हल्ला करणाºया २७ वर्षीय युवकाची जामिनावर सुटका केली. व्यवसायाने आर्किटेक्ट असलेल्या करण नायर याने अ‍ॅड. निरंजन मुंदर्गी यांच्याद्वारे उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या अर्जावर न्या. भारती डांगरे यांच्यापुढे सुनावणी होती.

कोरोनामुळे संचारबंदी असतानाही ८ मे रोजी करण मरिन ड्राइव्ह येथे फिरायला निघाला. त्याला पाहताच पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी त्याची चौकशी केली. लॉकडाऊनमध्ये घराबाहेर का पडला आणि तेही मास्क न लावता, असे त्यांनी विचारले. मात्र, नायरने उत्तर देण्याचे टाळत पोलिसांवर हल्ला करून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला अटक केली.
करणकडे चाकू असल्याचा आरोप पोलिसांनी केला, परंतु वकिलांनी तो फेटाळला. करणकडे आर्किटेक्टसाठी असलेले एक साधन होते.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सांगितले की, आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. शहरात संचारबंदी लागू केल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांवर प्रचंड दबाव होता आणि अर्जदाराला अटक केली जाईल, अशी भीती वाटल्याने तो पळून गेला.
लॉकडाऊनमुळे कंटाळवाणे व वैतागलेले वातावरण निर्माण झाले आहे आणि त्यात तरुण अडकतात, असे न्यायायलयाने म्हटले.

५० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका
कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना आणि अर्जदार एका चांगल्या घरातील तरुण असल्याने त्याची ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

Web Title: Lockdown has created a dull atmosphere - High Court