लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 07:01 IST2025-08-12T07:01:03+5:302025-08-12T07:01:03+5:30
ऑगस्टअखेरपर्यंत ३४ स्टेशनवर प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणार

लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
महेश कोले
मुंबई : मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून (सीएसएमटी) खोपोलीपर्यंत १५ डब्यांच्या सेवा वाढविण्याची तयारी केली आहे. त्यानुसार ऑगस्ट अखेरपर्यंत सीएसएमटी कल्याण दरम्यान धीम्या आणि जलद मार्गावरच्या १० स्टेशनवर २६ प्लॅटफॉर्म आणि कल्याण ते कसारा आणि खोपोली मार्गावरील २४ स्टेशनच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यात येणार आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी ३१ ऑगस्ट ही अंतर्गत मुदत निश्चित केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, मान्सूनमुळे यामध्ये थोडा उशीरदेखील होण्याची शक्यता असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.
मुंब्रा दुर्घटनेनंतर लोकलमधील प्रवासी क्षमता वाढविण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या आठवड्यात, मुंबई दौऱ्यावर आलेल्या रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ सतीश कुमार यांनी अधिकाऱ्यांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास सुनिश्चित करण्यासाठी १५ डब्यांच्या सेवा वाढविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार १५ डब्यांच्या लोकलसाठी आवश्यक काम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीएसएमटी-कल्याण दरम्यान जलद मार्गावरील पाच स्थानके, ठाणे-कल्याण दरम्यान धिम्या मार्गावरील आठ स्थानके आणि कल्याण-कसारा/खोपोलीवरील स्थानकांवर १५ डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्यात येणार आहे, तर ठाणे आणि कल्याण दरम्यानच्या ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर, ठाकुर्ली आणि कल्याण या धिम्या मार्गावरील स्टेशनवरील प्लॅटफॉर्म १५ डब्यांच्या गाड्या थांबविण्यासाठी सज्ज केली जातील, ज्यामुळे वाहतूक क्षमता २५ टक्क्यांनी वाढेल.
या कामांचा समावेश
या प्रकल्पांतर्गत ओव्हरहेड वायर (ओ एच इ) स्थलांतर, सिग्नल पोल हलवणे, ट्रॅक बदल आणि आवश्यक जागा निर्मितीची कामे प्राधान्याने करण्यात येत आहेत.
मुंब्रा आणि विक्रोळी येथे ओएचई कामांसाठी प्रत्येकी ७५-८० लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
दिवा स्थानकाचा अडथळा
दिवा हे सर्वाधिक वर्दळीचे स्थानक असून, येथे असलेल्या लेव्हल क्रॉसिंग गेटमुळे दररोज सरासरी ३९ वेळा फाटक उघडले जाते. त्यामुळे ८९४ रेल्वे सेवांपैकी ७०-७५% स्थानिक सेवांवर परिणाम होतो. पादचारी पुलाचे गर्डर उभारले असले तरी अमीन अधिग्रहण पूर्ण न झाल्याने काम रखडले आहे.
आता या स्थानकात थांबणार १५ डब्यांच्या लोकल
धिम्या मार्ग: शहाड, आंबिवली, टिटवाळा, खडवली, वासिंद, आसनगाव, आटगाव, खर्डी, उंबरमाळी, कसारा, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, शेलू, भिवपुरी, कर्जत, पळसदरी, डोलावली, लवजी, खोपोली.
जलद मार्ग : विक्रोळी, कळवा, मुंब्रा, दिवा.
सध्या १५ डब्यांच्या लोकल सीएसएमटी, भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली आणि कल्याण या स्थानकांवर थांबतात.