Join us

वाघिण मुंबईत येतेय, दम असेल तर अडवून दाखवा; बबिता फोगाटनं दिलं चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 15:52 IST

शिवसेना पाठोपाठ मनसेनं अभिनेत्री कंगना राणौतला धमकीवजा इशारा दिला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मी ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहे, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा, अशा शब्दात कंगना राणौतने ट्विटरवरुन आव्हान दिले आहे. तिच्या या आव्हानानंतर भाजपात प्रवेश केलेल्या दंगल गर्ल बबिता फोगाटनं तिला वाघिण असं म्हणून खुलं चॅलेंज दिलं. 

"मला अनेक जण मुंबईला परत न येण्याची धमकी देत आहेत, म्हणून मी ठरवले आहे की, येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर किती वाजता उतरणार, याची वेळ लवकरच सांगेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा", असा एल्गार कंगनाने केला. भाजपा नेते परवेश साहिब सिंह यांच्या ट्विटला रिट्विट करत कंगनाने असे म्हटले आहे. "कुणाच्या वडिलांची जहागीर आहे का मुंबई? महाराष्ट्रात काय होत आहे उद्धव ठाकरे?" असा सवाल परवेश साहिब सिंह यांनी केला होता.

कंगनाचं हे ट्विट रिट्विट करून बबिता म्हणाली की,''9 सप्टेबंरला वाघिण मुंबईत येतेय, कुणात हिम्मत असेल तर अडवून दाखवा. ती वेळही लवकरच सांगेल.''  दरम्यान, "मी पोकळ धमक्या देत नाही, मी शिवसैनिक आहे, अ‍ॅक्शनवाला माणूस, नौटंक्या करत नाही. या काही मेंटल केस मुंबईत वाढल्या आहेत, त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी कारवाई करावी, अशा शब्दात संजय राऊत यांनी कंगना राणौतवर हल्लाबोल केला. याशिवाय, धमकी वगैरे देण्याची मला सवय नाही, आम्ही अ‍ॅक्शन घेतो, महाराष्ट्रात कमवते, खाते, मुंबई पोलीस त्यांचं रक्षण करते आणि त्यांच्यावरच आरोप कोणी करत असेल तर आम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही का?" असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

याचबरोबर, मनसेचे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी कंगना राणौतला धमकीवजा इशारा दिला आहे. मुंबई पोलिसांबद्दल काहीही बरळलेले कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही, असे मनसेने म्हटले आहे. याबाबत मनसेचे अमेय खोपकर यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, माझ्या मुंबई पोलिसांबद्दल जजमेंटल होऊन कुणीही पंगा घेऊ नये. मुंबईत आज आमच्या बहिणी मध्यरात्रीसुद्धा कामावरुन घरी बिनधास्तपणे जातात, याला कारण आहे मुंबई पोलीस. आज मुंबईत मी सुरक्षित आहे ते केवळ मुंबई पोलिसांमुळेच. कामाचा कितीही ताण असो, पगार अनियमित असो, मनुष्यबळ कमी असो, ऊन असो-पाऊस असो..कशाचीही पर्वा न करता हिंमतीने पाय रोवून उभे राहतात ते मुंबई पोलीस, असे त्यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :कंगना राणौतबबिता फोगाट