Join us  

'आमच्या हक्काच्या संरक्षणासाठी आम्ही सर्व एकत्र'; वडेट्टीवार भुजबळांच्या समर्थनार्थ मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 5:29 PM

२० फेब्रुवारीला संभाजीनगर येथे ओबीसींच्या विराट सभेचे आयोजन.

Vijay Wadettiwar ( Marathi News ):मुंबई-मराठा आरक्षण मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून राज्यात आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली आहे. दरम्यान, राज्यातून ५४ लाख नोंदी सापडल्याचा दावा केला आहे. राज्य सरकारनेही याबाबत अधिसूचना काढली आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. आता मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनात विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार मैदानात उतरले आहेत. 

“राज्याचे मंत्रिमंडळ छगन भुजबळ यांचे ऐकत नाही, हे दुर्दैव”; सुप्रिया सुळेंची खोचक टीका

'मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची अधिसूचना काढण्यात आली. ही अधिसूचना काढण्याबाबतचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत झाला नाही. मंत्रीमंडळाला विश्वासात न घेता मराठा समाजाचा नेता म्हणून मिरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही मराठा आरक्षणाबाबतची अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेमुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला असून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येत्या २० फेब्रुवारीला संभाजीनगर येथे ओबीसींच्या विराट सभेचे आयोजन केले आहे. ही सभा ओबीसींच्या संविधानिक हक्काच्या रक्षणासाठी आहे. आरक्षण देण्यावरून सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असून या लढाईमुळे ओबीसी समाजाला उद्ध्वस्त करण्याचे पाप सरकारकडून केले जात आहे. असा हल्लाबोल करत आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोधी नाही, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

वडेट्टीवार म्हणाले की, गृहमंत्री म्हणताता भाजप आहे तोपर्यंत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. केंद्रीय मंत्री राणे म्हणतात स्वाभिमानी मराठा समाज कुणबी समाजामध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही. मुख्यमंत्री म्हणतात की, आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील. गृहमंत्री म्हणतात सरसकट गुन्हे मागे घेता येणार नाहीत. यावरून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमधील विसंवाद दिसून येतो. हे सरकारच ओबीसी विरूद्ध मराठा हा वाद निर्माण करून दोन्ही समाजामध्ये संशयाचे वातावरण निर्माण करत आहे.

सगेसोयरे शब्दामुळे ओबीसी आरक्षणात कोणाचाही शिरकाव होऊ शकतो. त्यामुळे ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण देण्यास आमची हरकत नाही. सध्याच्या अधिसूचनेत अटी शिथिल केल्यामुळे प्रमाणपत्र कोणालाही मिळू शकते हे चुकीचे आहे. सरकार एकाच समाजाचे हित पाहत आहे. सरकारची ही अडेलतट्टूपणाची भूमीका ओबीसी समाजाला खड्ड्यात घालणारी आहे. अशा शब्दात  वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका करत ओबीसी समाजातील बांधवांनी १६ फेब्रुवारीपर्यंत अधिसूनेवर आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

संभाजीनगर येथे २० फेब्रुवारीला ओबीसींची विराट सभा होणार आहे. या सभेपूर्वी येत्या ५ तारखेपासून राज्यातील आमच्या शक्तीस्थळाना भेट देवून आम्ही स्फूर्ती घेणार आहोत. याची सुरूवात चैत्यभूमीपासून होणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेला समर्थन असल्याचेही वडेट्टीवार यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचबरोवर सध्या महाराष्ट्रात आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सर्व्हेंवर विरोधी पक्षनेत्यांनी आक्षेप नोंदविला.

टॅग्स :विजय वडेट्टीवारमराठा आरक्षणओबीसी आरक्षण