Join us  

Man ki Baat: ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत संवाद साधणारे डॉ. शशांक जोशी कोण आहेत? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 6:26 PM

Coronavirus: कोरोनाबाबत लोकांचं दुर्लक्ष होत असून रुग्णालयात उपचारासाठी विलंब करत आहेत. कोरोनाची लक्षणं आपोआप निघून जातील असं काहींना वाटतं.

ठळक मुद्देव्हॉट्सअपवर विविध मेसेज व्हायरल होतात त्यावर भरवसा ठेऊ नये. त्याचसोबत रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पाठीमागे धावू नका. महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्समध्ये ते सदस्य असून राज्यात कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी ते प्रयत्न करत आहेतकेंद्र सरकारच्या निर्णयापूर्वीच देशात ४५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या लोकांना कोविडची लस द्यावी अशी शिफारस केली होती.

मुंबई – संपूर्ण देशात कोरोना व्हायरसनं हाहाकार माजलेला असताना रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून तज्ज्ञ डॉक्टरांसोबत संवाद साधला. यात महाराष्ट्र कोविड टास्क फोर्समधील एक सदस्य डॉ. शशांक जोशी यांचाही समावेश होता. लोकांनी कोरोना लाटेमुळे घाबरू नये, ही लाट ज्या वेगाने पसरतेय तसं कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढलं असल्याचं त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांच्या कार्यक्रमात डॉ. शशांक जोशी म्हणाले की, यावेळच्या कोरोना लाटेत लहान मुलं आणि तरूणही बळी पडले आहेत. कोणामध्ये कमी लक्षणं दिसतायेत तर कोणामध्ये जास्त लक्षण आढळून येत आहेत. ८०-९० टक्के लोकांमध्ये कोणतेही लक्षण दिसत नाही. लोकांना कोरोना म्यूटेंटमुळे घाबरण्याची आवश्यकता नाही. ज्याप्रकारे आपण कपडे बदलतो तसे व्हायरसही त्याचे रंग बदलत असल्याचं त्यांनी सांगितले.

व्हॉट्सअप मेसेजवर विश्वास न ठेवता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

कोरोनाबाबत लोकांचं दुर्लक्ष होत असून रुग्णालयात उपचारासाठी विलंब करत आहेत. कोरोनाची लक्षणं आपोआप निघून जातील असं काहींना वाटतं. त्याशिवाय व्हॉट्सअपवर विविध मेसेज व्हायरल होतात त्यावर भरवसा ठेऊ नये. त्याचसोबत रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पाठीमागे धावू नका. या इंजेक्शनचा वापर फक्त गंभीर कोरोनाग्रस्त रुग्णांना होतो असंही डॉ. शशांक म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’मध्ये सहभागी असणारे डॉ. शशांक जोशी हे मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमधील एंड्रोक्रिनोलॉजिस्ट कंसल्टंट आहेत. महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्समध्ये ते सदस्य असून राज्यात कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. अलीकडेच मुंबईत कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पुरेसे डॉक्टर्स आहेत परंतु गंभीर परिस्थिती काम करणाऱ्या तज्ज्ञांची कमी आहे असं ते म्हणाले होते.

डॉ. शशांक जोशी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयापूर्वीच देशात ४५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या लोकांना कोविडची लस द्यावी अशी शिफारस केली होती. शशांक जोशी यांनी दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारने केलेल्या कामाचंही कौतुक केले. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता दिल्ली सरकारने हॉस्पिटलमध्ये आणि हॉटेलमध्ये बेड्स वाढवले होते. ते कौतुकास्पद असल्याचं शशांक जोशी म्हणाले होते.

टॅग्स :कोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यानरेंद्र मोदी