किरण यांचे देहदान
By Admin | Updated: August 4, 2014 01:33 IST2014-08-04T01:33:39+5:302014-08-04T01:33:39+5:30
‘देहदान हे श्रेष्ठदान’ याचा प्रचार गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे

किरण यांचे देहदान
मुंबई : ‘देहदान हे श्रेष्ठदान’ याचा प्रचार गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र २५ वर्षांपूर्वीच मृत्यूनंतरही आपल्या देहाचा उपयोग व्हावा म्हणून देहदान करण्याचा निर्णय अंधेरी येथे राहणाऱ्या मनमौजी आणि किरण मिश्रा या दाम्पत्याने घेतला होता. २७ जुलै रोजी किरण मिश्रा (६३) यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे पती मनमौजी यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली. किरण यांचा देह त्यांनी जे.जे. रुग्णालयाला दान केला आहे.
अंधेरी पूर्व येथे राहणाऱ्या मनमौजी मिश्रा यांच्या पत्नी किरण यांना मधुमेह होता. घरात पडल्यामुळे त्यांना जखम झाली होती. एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा २७ जुलै रोजी मृत्यू झाला. अनेक प्रथा, परंपरा आपण वर्षानुवर्षे पाळत आहोत. माणसाचा मृत्यू झाला की त्याला जाळले जाते. जाळताना लाकडाचा वापर करतात, यामुळे दरवर्षी हजारो किलो लाकडे जाळली जातात. मात्र त्याचा उपयोग असा काहीच होत नाही. निसर्गाची होणारी हानी यातून भरून निघत नाही. काही ठिकाणी नदीच्या पाण्यात मृतदेह सोडून दिले जातात. मृत्यूनंतर आपल्या शरीराची राख होण्यापेक्षा त्याचा कोणाला तरी उपयोग झाला पाहिजे, याच विचारातून आम्ही पती - पत्नीने मरणोत्तर देहदान करण्याचा निर्णय २५ वर्षांपूर्वी घेतला होता, असे मनमौजी यांनी सांगितले.
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल माहिती मिळावी म्हणून मानवी देहाची गरज असते. मात्र आपल्या येथे याविषयी जास्त जनजागृती झाली नसल्यामुळे देहदान, अवयवदान केले जात नाही. आपल्या देहाचा मृत्यूनंतरही कोणाला तरी उपयोग व्हावा हाच त्या काळात आम्ही विचार केला होता. माझ्या पत्नीचा माझ्या आधी मृत्यू झाला, तिची इच्छा मी पूर्ण केली, असे मनमौजी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)