Join us  

Kiran Mane : किरण माने उत्तम माणूस, मंत्री आव्हाडांनी शेअर केला अभिनेत्रीचा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 3:22 PM

अभिनेता किरण माने(Kiran Mane) यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेहमी चर्चेत असतात. परंतु किरण मानेंना मालिकेतून काढल्यानंतर त्यांचे चाहते आक्रमक झाले आहेत.

मुंबई - विविध राजकीय आणि सामजिक विषयांवर प्रखर भूमिका घेणारे अभिनेते किरण माने सध्या सोशल मीडियावर खुप चर्चेत आहेत. स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो या मालिकेतील विलास पाटील ही भूमिका त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर बिंबवली. किरण मानेंना या मालिकेतून बाहेर काढण्यात आल्यामुळे चांगलाच वाद रंगला आहे. त्यातच, स्टार प्रवाह वाहिनीने किरण मानेंचे महिलांबद्दलचे वर्तन योग्य नसल्याचं म्हटलं आहे. आता, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही एका अभिनेत्रीचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

अभिनेता किरण माने(Kiran Mane) यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेहमी चर्चेत असतात. परंतु किरण मानेंना मालिकेतून काढल्यानंतर त्यांचे चाहते आक्रमक झाले आहेत. आय स्टँड विथ किरण माने या नावानं हॅशटॅग वापरत प्रेक्षकांनी किरण माने यांना पाठिंबा दर्शवला आहे. तर माने यांनीही फेसबुकवर पोस्ट करत “काट लो जुबान, आंसूओसे गाऊंगा... गाड दो, बीज हूँ मै, पेड बनही जाऊंगा” अशा शब्दात सूचक इशारा दिला आहे. विशेष म्हणजे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही पहिल्यापासूनच त्यांचे समर्थन केले आहे. आता, आव्हाड यांनी मालिकेतील एका अभिनेत्रीचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, किरण माने हा उत्तम माणूस असल्याचं अभिनेत्री प्राजक्ता केळकर यांनी म्हटलंय.  किरण माने हे व्यक्ती आणि सहकलाकार म्हणून उत्तम माणूस आहे. त्यांचं सेटवरील आमच्यासोबतचं वागणं अतिशय उत्तम आहे, हसून-खेळून आपल्या सहकलाकाराला समजून घेणं या गोष्टी त्यांच्याकडून सेटवर दिसतात. मूळात स्त्री म्हणून मला गेल्या दीड वर्षात आजपर्यंत त्यांच्याकडून कधीही वाईट वर्तणूक झाली नाही, ना शब्दातून, ना वागण्यातून कुठल्याही गोष्टीतून नाही, असे मुलगी झाली हो... या मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता केळकर (कल्याणी) यांनी व्हिडिओतून सांगतिले आहे.

मुलगी झाली हो, या मालिकेतील अभिनेत्री श्वेता आंबीकर (आर्या), प्राजक्ता केळकर (कल्याणी) व शितल गीते (अक्षरा) यांच्या या बोलक्या प्रतिक्रियाच सांगतात की, किरण माने यांना सेटवरील वागणुकीमुळे नाही तर त्यांच्या सोशल मिडीयावरच्या लिखाणामुळे दबावतंत्र वापरुन मालिकेतुन काढले गेलंय, असे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरन म्हटलं आहे. 

टॅग्स :किरण मानेमुंबईजितेंद्र आव्हाड