Join us

...तर मी वाईट मार्गाला गेलो असतो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 12:02 IST

Kalidas Kolambkar: मुंबईतील गिरण्या बंद पडल्या. कामगार बेकार झाले. गिरणगाव गँगवॉरच्या मगरमिठीत ओढले गेले. त्या काळात गँगवॉरमुळे रोज खून व्हायचे. जसजसे वय वाढत होते, तसतसे गँगवॉर समजू लागले आणि त्याबद्दलचे आकर्षणही वाढू लागले. त्यानंतर...

-कालिदास कोळंबकर(आमदार)

घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. बाबा बॉम्बे डाइंग मिलमध्ये कामाला आणि आई गृहिणी. राहायला नायगावच्या बॉम्बे डाइंग मिलच्या चाळीतील १८० चौ. फूट घरात होतो. आई-बाबा, मोठा भाऊ, मागची बहीण, एक मामे भाऊ, आजी आणि मी असे सात जण एका घरात राहत असू. घरात कधी मोठा मासा शिजलेला पाहिल्याचे आठवत नाही. यावरून आमची घरची परिस्थिति काय असेल, याचा अंदाज येईल. मुंबईतील गिरण्या बंद पडल्या. कामगार बेकार झाले. गिरणगाव गँगवॉरच्या मगरमिठीत ओढले गेले. त्या काळात गँगवॉरमुळे रोज खून व्हायचे. जसजसे वय वाढत होते, तसतसे गँगवॉर समजू लागले आणि त्याबद्दलचे आकर्षणही वाढू लागले. दाऊद-गवळी यांच्या टोळ्या मुंबईत कार्यरत होत्या. टोळीतील काही मुले आमच्या विभागात राहणारी होती. कधीतरी नाक्यावर त्यातले ४-५ जण दिसले, तर आम्ही त्यांच्याकडे जायचो. एखाद्या सेलेब्रिटीला पाहिल्यासारखं वाटायचं. आम्ही तेव्हा शाळेत होतो. गँगमधील गुंडांसोबत बोलत असल्याचे आईने एकदा पाहिले आणि बाबांना सांगितले की, कालिदासला गावी पाठवू. त्यानंतर मला मालवणला गावी पाठवले. कालांतराने त्या टोळीतील अनेकाचे एन्काऊंटर झाले किंवा प्रतिस्पर्धी गँगने खून केले. त्यांचे हाल झाले. त्यांचा अंत कसा झाला ते कानावर आले आणि आपण किती नादान होतो, हे नंतर लक्षात आले. त्यावेळी आईने गावी धाडण्याचा निर्णय घेतला नसता, तर वाममार्गाला लागलो असतो.

चार-पाच वर्षांनी पुन्हा मुंबईला आलो. इंटर्नपर्यंत शाळा पूर्ण केली. आज मी जे आहे याचे सर्व श्रेय निश्चितच मी माझ्या आईला देईन. आईने मला जन्म दिला आणि बाळासाहेबांनी (ठाकरे) मला राजकीय जन्म दिला आणि मी घडत गेलो. राजकारणात येण्यापूर्वी मी २-३ वेगवेगळ्या नोकऱ्याही केल्या. घरात सगळे निर्णय मीच घेतो. पत्नीचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. 

जनता दरबार हाच विरंगुळागेली ३५-४० वर्षे माझे आयुष्य राजकारणाभोवतीच आहे. मलाही लोकांमध्ये राहायला आवडते. अनेकांची वेगवेगळी कामे असतात. विभागातील अनेकांच्या घराशी माझा थेट संपर्क असल्याने त्यांच्या घरातील समस्याही शक्य असेल तेवढ्या सोडवण्याचा प्रयत्न असतो. अनेक जाती-धर्माचे लोक माझ्या मतदारसंघात असल्याने ‘जनतेचा दरबार’ हाच माझा विरंगुळा असतो.

जनतेच्या साथीने विश्वविक्रम राजकारणातील एकमेव मित्र नारायण राणे. ते सर्वश्रूत आहे. त्यांनी माझ्यासाठी खूप केलं. मैत्रीची एक आठवण सांगावीशी वाटते. मी शिवसेना सोडल्यानंतर राणे यांच्या जवळचा म्हणून मला नगरविकास खात्याच्या मंत्रीपदाची कॉंग्रेसकडून विचारणा झाली, तेव्हा मी स्पष्ट सांगितले की ज्या मंत्रिमंडळात माझा मित्र नाही त्या मंत्रिमंडळात मी राहणार नाही. मी राजकारणात काही तत्त्व पाळली. मी पक्ष बदलले याचे कारण जनतेची कामे होत नव्हती. भाजपमध्ये येताना मी पोलिस हाऊसिंग, बीडीडी चाळ पुनर्वसन, भीम ज्योत, गिरणी कामगार चाळीचा एफएसआय वाढ आणि एक जलतरण तलाव. ही सगळी कामे व्हावे, याचा आग्रह धरला. ती कामे झाली याचा आज आनंद आहे, म्हणून जनता माझ्यासोबत आहे. मी सलग नऊ वेळा विधानसभेवर निवडून विश्वविक्रम केला, तो या जनतेमुळेच.

‘त्या’ जेवणाची चव विसरत नाहीमालवणी असल्याने मांसाहार आवडतो. पण, विशेषतः मासे. बोंबिल फ्राय, शिंपले माझे आवडते पदार्थ. आईच्या हातची चव काही वेगळीच होती. त्या जेवणाची चव मिळणार नाही, ही खंत आहे.

पांढरा शर्ट-पँट घालायला आवडतेकपड्यांचा मी फार शौकीन नाही. शर्ट-पँट घालायला सोयीस्कर आणि बरं वाटतं. मोठा काळ राजकारणात गेल्याने, पांढरे कपडे आवडतात.     शब्दांकन : सुजित महामुलकर

टॅग्स :कालिदास कोळंबकरभाजपा