Join us  

पत्रकार स्वतंत्र विचारसरणीचा असावा, त्याला पक्षाचे लेबल लागू नये-  मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2020 5:53 AM

ज्येष्ठ पत्रकार तसेच लोकमतचे सल्लागार संपादक दिनकर रायकर यांना कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार प्रदान

मुंबई : दंगल किंवा इतर घटना सुरूअसताना घटनास्थळी जाऊन पत्रकार तेथील वृत्तान्त मांडत असतो. राजकारण्यांवर आसूड ओढण्याची वेळ आली तरी पत्रकार मागे-पुढे पाहत नाही. पत्रकार हा स्वतंत्र विचारसरणीचा असावा, त्याला पक्षाचे लेबल लागू नये, असे मत बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

या वेळी ज्येष्ठ पत्रकार तसेच ‘लोकमत’चे सल्लागार संपादक दिनकर रायकर यांना ‘कृ. पां. सामक जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (वाहिनी) राहुल कुलकर्णी, राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (वृत्तपत्र) जान्हवी पाटील, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ सदस्याकरिता दिला जाणारा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार संजय बापट यांना देण्यात आला.

या वेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोणत्याही पत्रकारितेच्या कार्यक्रमाला जाताना पत्रकारितेची वाटचाल डोळ्यांसमोर येते. पत्रकार एखाद्या कार्यक्रमाला बोलावतात किंवा आपल्या मागण्या मांडतात याचा अर्थ आपण स्थिरावलो आहोत. हे सरकार नक्कीच टिकेल, याची विरोधकांनाही खात्री पटली असेल, असे ते म्हणाले.

आपण दिवसभर दोन घासांसाठी धावपळ करतो; पण ते पिकवणारा शेतकरी आत्महत्या करत असेल तर वाईट आहे. जो जगला नाही तर आपण कसे जगणार? शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे कायमचा उपाय नाही. कर्जमुक्ती करायला हवी. पण बºयाच बाबी आपल्या हातात नाहीत. ते काम कठीण आहे. त्यातून आमचे सरकार नक्कीच मार्ग काढेल. सुसंस्कृत महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार सहन करणार नाही. गुन्हेगार जिथे कुठे असेल त्याला पकडून कारवाई करा, असे ते म्हणाले.

पुरस्काराला उत्तर देताना दिनकर रायकर म्हणाले, ४९ वर्षांच्या पत्रकारितेत अनेक स्थित्यंतरे, घडामोडी पाहिल्या. सलग १७ वर्षे विधिमंडळ पत्रकारिता केली. आतासारखे तेव्हा बिट नसायचे, एकाच पत्रकाराला सर्व राजकीय पक्ष, अधिवेशन, इतर कार्यक्रमांचा वृत्तान्त द्यावा लागत असे. त्यामुळे ओळख वाढण्यास मदत झाली. आता पत्रकारिता सोपी झाली आहे. प्रेसनोट मिळते, केवळ मथळा बदलायचा असतो. विधिमंडळात राज्यातील २८८ आमदार आपल्या मतदारसंघातील समस्या मांडायचे. त्यातून जे शिकायला मिळाले ते कोणत्याही विद्यापीठात शिकता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण आणि कन्नमवार वगळता सर्व मुख्यमंत्र्यांशी मैत्रीपूर्ण संबंध होते, असे ते म्हणाले.

शेतकरी आत्महत्यांबाबत बोलताना रायकर म्हणाले, पुलोद सरकारच्या काळात पहिल्यांदा सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज माफ केले. तो तेव्हा क्रांतिकारी निर्णय होता. शेतकºयांबाबत प्रत्येक सरकारला कनवळा आहे तर शेतकºयांचा प्रश्न का सुटला नाही याचा विचार पत्रकारांनी करायला हवा. यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मार्ग काढतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जगात काही घडले तर मला पहिल्यांदा कळले पाहिजे असे वाटते. पत्रकारिता ही माझी पॅशन असून त्यामुळेच हा प्रवास सुरू आहे, असेही रायकर यांनी सांगितले.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने देण्यात येणारा ‘कृ. पां. सामक जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार तसेच ‘लोकमत’चे सल्लागार संपादक दिनकर रायकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आला. या वेळी डावीकडून संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, रायकर यांच्या पत्नी पुष्पा रायकर, कार्यवाहक अनिकेत जोशी, माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :उद्धव ठाकरेलोकमतमहाराष्ट्रमुंबईपत्रकार