Join us  

'हलगर्जीपणामुळेच पत्रकाराचा बळी, मृत्युप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 1:10 PM

भाजपा नेते एकनाथ खडसे आणि अतुल भातखळकर यांनी सरकारवर टीका करत, शासनाच्या असुविधेचा हा बळी असल्याचं म्हटले आहे. तसेच, प्रशासन व्यवस्थेतील ज्यांनी ज्यांनी हलर्गीजपणा केला, त्या हलगर्जीपणाचा हा बळी आहे

ठळक मुद्देभाजपा नेते एकनाथ खडसे आणि अतुल भातखळकर यांनी सरकारवर टीका करत, शासनाच्या असुविधेचा हा बळी असल्याचं म्हटले आहे. तसेच, प्रशासन व्यवस्थेतील ज्यांनी ज्यांनी हलर्गीजपणा केला, त्या हलगर्जीपणाचा हा बळी आहे

मुंबई - कोट्यवधी रूपये खर्च करून, मोठा गाजा-वाजा करीत कोविड-१९ च्या रूग्णांसाठी उभारण्यात आलेल्या जम्बो हॉस्पिटलचा फोलपणा बुधवारी उघड झाला. अ‍ॅम्ब्युलन्सची अनुप्लब्धता, व्हेंटिलेटर-ऑक्सिजन खाटांच्या नियोजनातील ढिसाळपणा आणि मुर्दाड यंत्रणेचा फटका बसल्याने खासगी वृत्तवाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा ४२ व्या वर्षी हकनाक बळी गेला. रायकर यांच्या निधनानंतर राज्य सरकार आणि प्रशासकीय कारभाराचे धिंदवडे निघाले आहेत. त्यामुळे, याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपा नेत्यांनी केली आहे. 

भाजपा नेते एकनाथ खडसे आणि अतुल भातखळकर यांनी सरकारवर टीका करत, शासनाच्या असुविधेचा हा बळी असल्याचं म्हटले आहे. तसेच, प्रशासन व्यवस्थेतील ज्यांनी ज्यांनी हलर्गीजपणा केला, त्या हलगर्जीपणाचा हा बळी आहे. त्यामुळे, ज्यांनी हलगर्जीपणा केला, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. राज्य सरकारने 3 जून रोजी कोरोना वॉरियर्स म्हणून पत्रकारांना 50 लाख रुपयांचा विमा सुरक्षा कवच देण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्यापही पत्रकारांसदर्भातील जीआर काढण्यात आला नाही. त्यामुळे, रायकर यांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत करुन दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.  मुळचे नगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले रायकर पत्रकारितेनिमित्ताने पुण्यात स्थायिक झाले होते. पार्थिवावर दुपारी पुण्यातच अंत्यसंस्कार करण्यातआले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई-वडील असा परिवार आहे. रायकर यांना ३१ ऑगस्टला रात्री सीईओपीच्या मैदानावरील कोविड-१९ जम्बो हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.उपचारादरम्यान त्यांनी इतर पत्रकारांना केलेले मेसेज हे अतिशय धक्कादायक होते. मंगळवारी रात्री दीड वाजता ‘मला खूप वाईट वाटतंय’, मला जेवायला द्या, औषध द्या,’ असे संदेश त्यांनी पाठवले होते./'

‘‘त्यांची स्थिती खूपच खालावल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी अनेक सरकारी अधिकारी-पदाधिकाऱ्यांना फोन केल्यानंतरही एक कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध होऊ शकली नाही. हा बळी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा आणि असंवेदनशिलतेचा आहे,’’ असा आरोप पुणे श्रमिक पत्रकार संघाने केला आहे.

चौकशीसाठी समिती

‘‘पांडुरंग रायकर यांच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये काही कमतरता होती किंवा कसे या करिता चौकशी करण्यासाठी ससून रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांना विनंती करण्यात आली आाहे,’’ असे पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले, की जम्बो हॉस्पिटल सज्ज नसतानाही त्याचे उद्घाटन करण्यात आले. यंत्रणेअभावी रायकर यांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :एकनाथ खडसेकोरोना वायरस बातम्यापुणेमृत्यूसरकार