Join us  

Jayant Patil : राज ठाकरेंना भीती वाटत असेल तर; जयंत पाटलांनी लगावला खोचक टोमणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 5:34 PM

राज ठाकरे यांना कोण कशाला इजा करेल. मला वाटत नाही राज ठाकरे यांना धोका आहे

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray आणि मला जीवे मारण्याच्या धमकीचं एक पत्र माझ्या लालबागच्या पक्ष कार्यालयात आलं असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर MNS Leader Bala Nandgaonkar  यांनी दिली आहे. याच पत्रासंदर्भात बाळा नांदगावकर यांनी आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे संबंधित पत्र सुपूर्द केलं. त्यानंतर बाळा नांदगावकर यांनी याबाबतची माहिती प्रसार माध्यमांना दिली. या धमकी पत्रावरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी मनसेला खोचक टोला लगावला. 

राज ठाकरे यांना कोण कशाला इजा करेल. मला वाटत नाही राज ठाकरे यांना धोका आहे. पण, त्यांना भीती वाटत असेल तर संरक्षण दिले पाहिजे. त्यासाठी, आमची कोणतीही तक्रार नाही, असे स्पष्ट मत जयंत पाटील यांनी राज ठाकरेंना मिळालेल्या धमकीच्या पत्रासंदर्भात व्यक्त केले. तसेच, अलीकडे राज्यात नवीन फॅशन सुरू झाली आहे. केंद्र सरकारमधूनच संरक्षण पुरवलं जातं आणि त्यात नुकतेच दोन-तीन उदाहरणे झाली आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच केंद्र सरकार राज्यातील व्यक्तींना संरक्षण देत आहे. त्यामुळे तुमची भाजपबरोबर चांगली मैत्री असेल तर तुम्हालाही संरक्षण देण्याची व्यवस्था होऊ शकते, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

सदाभाऊंची आमदारकी संपत आलीय - पाटील

उपरोधिकदृष्टया सदाभाऊ खोत भाजपच्या विरोधात बोलू शकत नाहीत कारण त्यांची विधानपरिषदेची मुदत संपत आली आहे त्यामुळे काय बोलायचं म्हणून 'शालीतून जोडा' त्यांच्याच आमदाराने भाजपला मारला आहे अशी मिश्किल टीका जयंत पाटील यांनी केली. सदाभाऊ खोतांच्या वक्तव्यावर हसायचं की रडायचं हेच कळत नाही. सदाभाऊ खोत यांनी महागाईचे समर्थन केले आहे. या देशात महागाईने सामान्य जनता होरपळत आहे एवढी प्रचंड महागाई आहे. ६० रुपयावर पेट्रोल गेले तरी केंद्रात बसलेले नेते मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरत होते. आज १२५ वर पेट्रोल गेले. परवाच गॅस ५० रुपयांनी वाढला. देशभर लोकांना महागाईची झळ बसली आहे त्यामुळे सदाभाऊ खोत यांनादेखील महागाईची झळ बसली असेल तर कदाचित उपरोधाने ते बोलले असतील अशी शंका जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

तर महाराष्ट्र पेटेन - नांदगांवकर 

"माझ्या लालबागच्या कार्यालयात काल एक धमकीचं पत्र प्राप्त झालं आहे. त्यात मला आणि राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत मी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज मी राज ठाकरेंना ते पत्र दाखवलं व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटून संबंधित पत्र त्यांच्याकडे दिलं आहे. आता ते याबाबत चौकशी करतील. गृहमंत्र्यांनी तातडीनं पोलीस आयुक्तांशी बोलून याचा तपास करण्याचं आश्वासन मला दिलं आहे. पण एक सांगतो. मला दिलेली धमकी एक वेळ ठीक. पण राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी महाराष्ट्र पेटून उठेल हे राज्य सरकारनं लक्षात ठेवावं", असं बाळा नांदगावकर म्हणाले.  

टॅग्स :जयंत पाटीलराज ठाकरेराष्ट्रवादी काँग्रेससदाभाउ खोत