Join us  

पुन्हा एकदा राष्ट्रवादीला गतवैभव आल्याशिवाय राहणार नाही, जयंत पाटलांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 4:32 PM

'उपरा' कार पद्मश्री लक्ष्मण माने यांचा आज राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

मुंबई - उपराकार लेखक लक्ष्मण माने यांच्यामुळे राज्यातील प्रत्येक वाडीवस्तीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पोहोचेल. त्यांचे प्रश्न आम्ही सरकार दरबारी मांडू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादीला गतवैभव आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

पद्मश्री लक्ष्मण माने यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. लक्ष्मण माने यांनी शरद पवारांची भेट घेऊन पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आज त्यांचे प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्यांचे स्वागत करत आहे. गेली अनेक वर्ष लक्ष्मण माने हे राज्यातील भटक्या विमुक्त वंचित घटकांसाठी काम करत आले आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत गेली ३० ते ४० वर्ष वाड्यावस्त्यांवर जाऊन वंचित घटकांना एकत्र करत आहेत. त्यांच्या न्याय मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत. 

पवारसाहेबांनी आजवर समाजातील 'नाही रे' वर्गासाठीच अधिक निर्णय घेतले आहेत. समाजात अजूनही असा मोठा वर्ग आहे, ज्यांना न्याय मिळालेला नाही. त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम आपल्याला करायचे आहे असेही जयंत पाटील म्हणाले. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करत असतानाही शरद पवार यांनी अल्पसंख्याक विकास आणि सामाजिक न्याय ही दोन खाती हक्काने मागून घेतली होती. दोन्ही खात्यामार्फत समाजातील उपेक्षित घटकाला न्याय देण्याचे काम आमच्या सरकारने केले असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. 

लक्ष्मण माने यांनी सूचवल्यानंतर ३३ वेगवेगळ्या जातींचा उल्लेख अर्थसंकल्पात करुन त्यांच्यासाठी विशेष तरतूद केली. त्यावेळी महाराष्ट्राचा सामाजिक न्यायाचा अर्थसंकल्प म्हणून तो प्रसिद्ध झाला. त्यावेळी वंचितांपर्यत पोहोचून आम्ही जे काम केले त्यामुळे २००४ साली विक्रमी संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आले अशी माहितीही यावेळी जयंत पाटील यांनी दिली. 

 

 

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसजयंत पाटीलशरद पवारमुंबईलक्ष्मण माने