Join us  

शक्तीचा जलविहार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 5:15 PM

मुंबईतल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयातील पक्ष्यांसह प्राण्यांचीदेखील वाढत्या ऊन्हाने होरपळ होत असून, त्यांना दिलासा देण्यासाठी येथे पुरेशा पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

मुंबई : मुंबईसह राज्याचा पारा दिवसागणिक वाढतच आहे. राज्यातील बहुतांशी शहरांचे कमाल तापमान ४० अंशा पार गेले आहे. परिणामी नागरिकांची ऊन्हाळे होरपळ होत आहे. आणि वाढत्या ऊन्हाचा फटका पक्षी, प्राण्यांनादेखील बसू लागला आहे. मुंबईतल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयातील पक्ष्यांसह प्राण्यांचीदेखील वाढत्या ऊन्हाने होरपळ होत असून, त्यांना दिलासा देण्यासाठी येथे पुरेशा पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याच प्राण्यांपैकी एक असलेला येथील शक्ती नावाचा वाघ आपल्या पिंज-यातील छोटयाशा तलावात मनसोक्त जलविहार करत असून, वाढत्या तापमानापासून स्वतचा बचाव करत आहे. 

 

 

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय येथे प्राणी व पक्ष्यासांठी पारंपारिक पद्धतीचे पिंजरे न उभारता, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाशी नाते सांगणारी दालने उभारण्यात आली आहेत. पूर्वीच्या पिंज-यांना असायचे तसे गज वापरण्याऐवजी दालनांच्या दर्शनी भागात उत्कृष्ट दर्जाची व वैशिष्ट्यपूर्ण प्रकारची मजबूत काच बसविण्यात आल्या आहेत. ज्यामुळे प्राण्यांना विना अडथळा बघणे व त्यांचे अधिक चांगले छायाचित्रण करणे शक्य होत आहे. मुक्त पक्षी विहारासह बिबट्यांच्या दालनाच्या सभोवताली जर्मनीहून आयात केलेली गंजरोधक व मजबूत जाळी बसविण्यात आली आहे. तसेच या जाळींमुळे दालनांच्या सौंदर्यला व कलात्मकतेला बाधा येणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे.

 

 

 

मुक्त पक्षी विहारात विविध प्रजातींचे १०० पक्षी असून याची कमाल क्षमता २०० पक्ष्यांची आहे. याच ठिकाणी पक्ष्यांना अनुरुप ठरतील अशी विविध प्रजातींची झाडेही आहेत. अशातच आता घाम फोडणारा ऊन्हाळा सुरु झाला आहे. परिणामी येथील पक्षी प्राण्यांना ऊन्हाचा त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाकडून पुरेशी काळाजी घेण्यात आली असून, अधिकाधिक पाण्याची व्यवस्था करण्यात आली. शक्ती नावाच्या वाघाच्या पिंज-यातील छोटयाशा तलावात भरपूर पाणी उपलब्ध करून देण्यात आले असून, हा वाघ सध्या वाढत्या ऊन्हापासून बचाव करण्यासाठी येथे मनसोक्त जलविहार करत आहे.

 

 

---------------------------------------------------हे माहिती आहे का?कोल्हा : लबाड आणि संधीसाधू प्राणी अशी ओळख असणारा कोल्हा हा त्याच्या जोडीदाराशी अत्यंत एकनिष्ठ राहतो. एकदा कुटुंब झालं की, कुटुंबासाठीची प्रत्येक गोष्ट नर व मादी दोघे मिळून करतात. अगदी शिकार करणं, जेवण करणं इत्यादी सर्व बाबी ते एकसाथ मिळूनमिसळून करतात. अगदी पिलू झाल्यानंतरही दोघेमिळून आपल्या पिल्लांची एकत्रितपणे काळजी घेतात.अस्वल : मध हे आवडते खाद्य असणा-या अस्वलाला कणीस, विविध प्रकारची फळे, किडे आणि वाळवी खायलाही आवडतं. अस्वलाच्या एका जेवणात ४ हजार ते १० हजार वाळवींचाही समावेश असू शकतो. नाकपुड्या बंद करण्याची एक वेगळी शक्ती निसर्गाने अस्वलाला बहाल केली आहे. यामुळे वाळवी खाताना किंवा मधमाशीच्या पोळ्यातील मध पिताना, ते आपले नाक बंद करुन घेते, ज्यामुळे ते कीटक त्याच्या नाकात जात नाहीत.बिबट्या : बिबट्या हा प्रती तास ५८ किलोमीटर वेगाने पळू शकतो. तर एका झेपेत सुमारे १९ फुटांपर्यंतचे अंतर पार करु शकतो. बिबट्याच्या अंगावर असलेले ठिपक्यांचा आकार हा गुलाबाच्या पाकळ्यांसारखा दिसतो.तरस : या प्राण्याचे मुख्य अन्न हे मृत प्राण्यांचे मांस आहे. तरसाचा जबडा हा अत्यंत मजबूत असून व दात हे अतिक्षण तीक्ष्ण असतात. तरस अनेकदा जो वैशिष्ट्यपूर्ण आवाज काढतो, तो माणसाच्या हसण्याशी मिळताजुळता असतो.

टॅग्स :वाघउष्माघातमुंबईमहाराष्ट्र