Join us  

'सरकारविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांना इंदिरा गांधींनीही 'राष्ट्रद्रोही शक्ती' म्हणूनच हिणवले'

By महेश गलांडे | Published: January 31, 2021 8:54 AM

गेल्या दोन महिन्यांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशीवर थंडी वाऱ्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी किसान सभेकडून नाशिक ते मुंबई असा मोर्चा काढण्यात आला

मुंबई - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात किसान सभेनं मुंबईतील आझाद मैदानात मोर्चाचं आयोजन केलं होतं. नाशिकहून आलेला मोर्चा आझाद मैदानातून राजभवनावर धडकणार होता. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करणारं निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्याचा शेतकऱ्यांच्या मानस होता. मात्र, शेतकरी आंदोलनाच्या दिवशी राज्यपाल गोवा दौऱ्यावर होते. त्यामुळे, शेतकऱ्यांना राज्यपालांकडे निवेदन देताच आले नाही, यावरुन राज्यपालांवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. विशेष म्हणजे माजी कृषीमंत्री आणि खासदार शरद पवार यांनीही भरसभेत राज्यपालांना टार्गेट केले. आता काँग्रेसनेही हेच केल्याचं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय.   

महाराष्ट्रातील शेतकरी पंजाबच्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत आला. हजारो शेतकरी राजभवनाला धडक देण्यासाठी निघाले. त्यांना अडवून ठेवले. शेतकऱ्यांचे नेते राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन देण्यास निघाले तेव्हा आपले महामहिम राज्यपाल हे गोव्याच्या दौऱ्यावर असल्याचे सांगण्यात आले. एरवी आपले राज्यपाल राज्याचे व लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःच पुढाकार घेत असतात, पण हजारो शेतकरी स्वतःच आपले प्रश्न घेऊन राजभवनाकडे निघाले, तेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची आयतीच संधी नाकारून राज्यपाल गोव्यास गेले, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच, कोश्यारी हे त्या दिवशी गोव्यातच होते व विधानसभेत त्यांनी भाषण केल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांचा गोवा दौरा हा आधीच ठरलेला असावा. ते काही असले तरी महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी हे कधी नव्हे इतके टीकेचा विषय ठरल्याचेही त्यांनी म्हटले. 

जेव्हा शेतकऱ्यांसाठी तुरुंगात गेलेले वाजपेयी; तीव्रता एवढी की काँग्रेसला जेल शोधावे लागले

घटनात्मक संस्थांवर राजकारणी बसवले की, दुसरे काय व्हायचे? हा विषय फक्त भाजपपुरता मर्यादित नाही. काँग्रेस राजवटीतही वेगळे काही घडत नव्हते. राष्ट्रपती, राज्यपाल हे शेवटी केंद्राचेच आदेश पाळतात. पंतप्रधान व गृहमंत्री यांना हवे तेच घडवून आणतात. आज सरकारने शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवून टाकले. त्यामुळे देशद्रोह्यांचे प्रश्न कसे सोडवायचे? 1975 साली सरकारविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांना इंदिरा गांधी यांनीही 'राष्ट्रद्रोही शक्ती' म्हणूनच हिणवले होते. जॉर्ज फर्नांडिस, जयप्रकाश नारायण यांनासुद्धा त्याच व्याख्येत बसवून कारवाई केली होती. त्याच संघर्षातून पुढे आणीबाणीचा भस्मासुर जन्माला आला, अशा शब्दात संजय राऊत यांनी काँग्रेसनंतर भाजपाकडूनही तेच होत असल्याचे म्हटलं आहे. 

'माझ्या आयुष्यातील पुण्य धनंजय मुंडेंना मिळो', तात्याराव लहानेंनी सांगितली आठवण

दरम्यान, 26 जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर आंदोलकांना देशद्रोही म्हणून हिणवले जात आहे, शेतकऱ्यांवर राष्ट्रद्रोही असल्याची टीका करण्यात येत आहे. त्यावरुन, संजय राऊत यांनी आपलं रोखठोक मत मांडलंय. 

राज्यपालांवर भडकले शरद पवार

गेल्या दोन महिन्यांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशीवर थंडी वाऱ्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी किसान सभेकडून नाशिक ते मुंबई असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आझाद मैदानात संबोधित केलं. शेतकरी राज्यपालांना भेटण्यासाठी, निवेदन देण्यासाठी मुंबईत आले असताना राज्यपाल मात्र गोव्याला गेले. यावरून पवार यांनी राज्यपालांना टोला हाणला. राज्याला इतिहासात पहिल्यांदाच असे राज्यपाल लाभले आहेत. हजारो शेतकरी कृषी कायद्यांच्या विरोधात मोर्चा काढून मुंबईत दाखल झाले. या शेतकऱ्यांना राज्यपालांना भेटून आपल्या मागण्यांचं निवेदन द्यायचं आहे. पण आमचे राज्यपाल गोव्याला गेले आहे. राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण माझ्या शेतकऱ्याला भेटायला वेळ नाही, असे पवार यांनी म्हटले होते.  

टॅग्स :इंदिरा गांधीसंजय राऊतकाँग्रेसशेतकरी संपशेतकरी