श्रेय घेण्याच्या प्रयत्नात महायुती सरकारने मुंबईकरांना धोक्यात घातले- किशोरी पेडणेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 10:44 IST2025-06-05T10:43:12+5:302025-06-05T10:44:09+5:30
नालेसफाईचा गाळ काढला गेला नसल्याची मंत्र्यांकडून कबुली

श्रेय घेण्याच्या प्रयत्नात महायुती सरकारने मुंबईकरांना धोक्यात घातले- किशोरी पेडणेकर
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नालेसफाईची कामे होण्यापूर्वी यावर्षी मुंबईत पाणी भरणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. परंतु, मे महिन्यात झालेल्या पावसातच मुंबईत पाणी तुंबले. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी नालेसफाईचा गाळ काढला गेला नाही, अशी कबुली दिली. त्यामुळे घाईघाईत कामे करून श्रेय लाटण्याच्या प्रयत्नात मुंबईकरांना धोक्यात घालण्याचे काम सरकारने केले आहे, अशी टीका मुंबईच्या माजी महापौर आणि उद्धवसेनेच्या उपनेच्या किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी केली.
जी दक्षिण विभागातील सातरस्ता येथे उद्धवसेनेच्यावतीने नाले, गटारांची साफसफाई आणि स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. मुंबईकरांचे पैसे यांनी नेमके कुठे खर्च केले? असा सवाल पेडणेकर यांनी केला.