मरोळमध्ये पार्किंगसाठी सम-विषम प्रणाली राबवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 02:56 IST2019-11-28T02:56:23+5:302019-11-28T02:56:51+5:30

अंधेरी पूर्वेकडील मरोळ येथे वाहन पार्किंगची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

Implement a partial asymmetric system for parking in the marrol | मरोळमध्ये पार्किंगसाठी सम-विषम प्रणाली राबवा

मरोळमध्ये पार्किंगसाठी सम-विषम प्रणाली राबवा

मुंबई : अंधेरी पूर्वेकडील मरोळ येथे वाहन पार्किंगची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. वाहन पार्किंगवर वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईमुळे नागरिकांना दंड भरावा लागतो. या दंडात्मक कारवाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सम-विषम धर्तीवर वाहन पे अ‍ॅण्ड पार्क पार्किंग प्रणाली राबविण्याच्यी मागणी रहिवाशांनी केली आहे.

मरोळ येथील चर्च रोड - बोहरी कॉलनी - भंडारवाडा - मरोळ मार्केट - हसनात शाळा - कदमवाडी परिसरात पार्किंगची जागा नसल्याने व अधिक वाहने समस्यांमुळे तसेच पार्किंगकरिता कोणतीही पर्यायी उपाययोजना न करता जोगेश्वरी वाहतूक विभागाकडून स्थानिक रहिवाशांवर दररोज दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच रस्त्यांवर वाहतूक समस्यांवर यशस्वी तोडगा काढण्यासाठी सम-विषम धर्तीवर वाहन पे अ‍ॅण्ड पार्क पार्किंग प्रणाली राबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मुंबईत दुचाकी आणि चार चाकी मिळून सुमारे ३३ ते ३५ लाख वाहने आहेत. त्या तुलनेत गाड्या पार्क करण्यासाठी फक्त १५ वाहनतळ असून, त्यात सुमारे नऊ हजार वाहनेच पार्क होतात. अवैध पार्किंग कायम असून, त्याचा फटका शहर आणि उपनगरातील नागरिकांना बसत आहे. मरोळमधील चर्च रोड - बोहरी कॉलनी - भंडारवाडा - मरोळ मार्केट - हसनात शाळा - कदमवाडी परिसरात मोठी धार्मिक स्थळे, प्राथमिक व माध्यमिक शाळा, मार्केट, दवाखाने आहेत. वाहतूक समस्यांवर तोडगा म्हणजे सम-विषम धर्तीवर वाहन पे अ‍ॅण्ड पार्किंग प्रणालीचा प्रयोग राबविण्यात यावा, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अंधेरी पूर्व विधानसभेचे विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांनी दिली.  

संख्येपेक्षा कमी क्षमतेचे वाहनतळ

महापालिकेने विकासकांना अतिरिक्त चार एफएसआय देऊन ९३ वाहनतळे बांधण्याचे कंत्राट दिले. या ९३ वाहनतळांमध्ये ५५ हजार ७४२ गाड्या पार्क होतील, असे नियोजन करण्यात आले. प्रत्यक्षात आतापर्यंत ९३ पैकी फक्त २६ वाहनतळे पालिकेच्या ताब्यात आली असून, त्यात २१ हजार ७७८ गाड्या पार्क होतील, इतकी जागा मिळाली आहे. मात्र प्रत्यक्षात १५ वाहनतळे सुरू झाली असून त्यात नऊ हजार गाड्या पार्क होऊ शकतील, ही थक्क करणारी वस्तुस्थिती आहे.

नागरिकांना त्रास होणार नाही, याची जाणीव ठेवून वाहने पार्क केली जातात. लोकांना चांगल्या नोकºया नाहीत; म्हणून दागिने, जमीन, घर इत्यादी गहाण ठेवून वाहने घेतली आहेत. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. परंतु जे दोन पैसे सुटतात ते आता दंड भरण्यात जातात. परिसरातील काही निवडक लोकांच्या तक्रारीवरून वाहतूक विभाग दंड आकारत आहे. त्यामुळे आता दर १५ दिवसांनी कारवाई केली जात आहे.
- मनीष कासारे, वाहन चालक

Web Title: Implement a partial asymmetric system for parking in the marrol