दादरचा कबुतरखाना तातडीने पूर्णपणे बंद करा, विरोध करतील त्यांच्यावर गुन्हा नोंदवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 15:28 IST2025-07-14T15:26:44+5:302025-07-14T15:28:02+5:30
राज्य सरकारने मुंबईतील कबुतरखाने हटवण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दादर पश्चिमेतील कबुतरखाना लवकरात लवकर पूर्णपणे हटवावा

दादरचा कबुतरखाना तातडीने पूर्णपणे बंद करा, विरोध करतील त्यांच्यावर गुन्हा नोंदवा!
खलील गिरकर
मुंबई
राज्य सरकारने मुंबईतीलकबुतरखाने हटवण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दादर पश्चिमेतील कबुतरखाना लवकरात लवकर पूर्णपणे हटवावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून जोर धरत आहे.
कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसन आणि फुफ्फुसांचे आजार पसरत असल्याने दादर येथील रहिवासी त्रस्त आहेत. मात्र, महापालिकेच्या या कारवाईला काही जणांचा विरोध असल्याने अद्याप हा कबुतरखाना सुरूच आहे.
राज्य सरकारने निर्देश दिल्यानंतर महापालिकेने दादर पश्चिमेतील कबुतरखान्याचे अनधिकृत बांधकाम आणि कबुतरांना दिले जाणारे खाद्य हटवले होते. मात्र, अद्याप कबुतरखाना सुरूच आहे. तेथे कबुतरांना खाण्यासाठी दाणे घालण्याचा प्रकार अद्याप बंद झालेला नाही. कबुतरांना दाणे घातल्यास कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र ही कारवाई केवळ नावपुरती केली जात असल्याचे चित्र आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही हा विषय चर्चेला आला होता.
मनसेने वेधले होते लक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय श्रुंगारपुरे यांनी महापालिकेकडे कबुतरखान्यामुळे होणाऱ्या त्रासाचा संदर्भ देऊन कबुतरखाने बंद करण्याची मागणी केली होती. कबुतरांची विष्ठा, त्यांची पिसे, यामुळे फुफ्फुसाचे आजार होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. या परिसरात उभे राहणे देखील अशक्य होत आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले होते.
जे विरोध करतील, त्यांच्यावर गुन्हा नोंदवा
कबुतरखान्यामुळे होणारा संभाव्य लक्षात घेऊन महापालिकेने ठोस कारवाई करण्याची गरज आहे. याबाबत जे विरोध करतील, त्यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणत असल्याचा गुन्हा नोंदविण्याची गरज असल्यचे मत श्रुंगारपुरे यांनी व्यक्त केले. कबुतरखाना सुरू करून त्या माध्यमातून काही जण आपला स्वार्त साधत असल्याचा आरोप त्यांनी केला.
कोणाच्याही दबावामुळे झुकू नका
१. दादर येथील कबुतरखानाच्या परिसरातील रहिवासी, दुकानदार, स्टॉलधारक, हॉटेल व्यावसायिक, फेरीवाले तसेच खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनाही त्रास होत आहे. त्यामुळे हा कबुतरखाना लवकरात लवकर हटवण्याची गरज आहे, असे स्थानिक रहिवासी सचिन राऊत यांनी सांगितले.
२. कोणाच्याही दबावामुळे कार्यवाही टाळू नये. जो त्रास होतो तो स्थानिक रहिवाशांना होतो, बाहेरच्यांना बोलायला काय जाते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.