CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज मंत्रालयातील पत्रकार परिषदेदरम्यान मंत्रिमंडळाच्या एका संभाव्य निर्णयाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांवर उघडपणे नाराजी व्यक्त करत खडेबोल सुनावल्याचं पाहायला मिळालं. तसंच मंत्रिमंडळ बैठकीआधीच घेण्यात येणाऱ्या निर्णयांची माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवणाऱ्या अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "मंत्रिमंडळ बैठकीआधीच असे निर्णय बाहेर येणं चुकीचं आहे. मी मंत्र्यांनाही याबाबतची सूचना दिली आहे. मंत्र्यांच्या कार्यालयांनी याबाबत खबरदारी घ्यावी, अन्यथा मी कारवाई करेन, असं सांगितलं आहे. कारण आपण गोपनीयतेची शपथ घेतलेली असते," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सहाव्या राज्य वित्त आयोगासह अन्य महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय?
- म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १ हजार ५९४ कोटींची मान्यता. या योजनेतून अवर्षण प्रवण भागात १ लाख ८ हजार १९७ हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा. (जलसंपदा विभाग)
- अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकरिता (ANTF) ३४६ नवीन पद निर्मिती व त्यासाठीच्या खर्चास मान्यता.(गृह विभाग)
- सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता. (वित्त विभाग)
- राज्यातील रोपवेच्या कामांसाठी राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. (NHLML) ला आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास मान्यता. (सार्वजनिक बांधकाम विभाग)
- जळगाव जिल्ह्यामधील चाळीसगांव तालुक्यातील वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्पाच्या १ हजार २७५ कोटी ७८ लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता. चाळीसगाव, भडगाव तालुक्यातील ८ हजार २९० हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा. (जलसंपदा विभाग)
- पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन देण्यास मंजूरी. (महसूल विभाग)