लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य सरकारने धारावी पुनर्विकासाचा मास्टर प्लान तत्काळ मागे घ्यावा. एमआरटीपी कायद्यानुसार सार्वजनिक सल्लामसलती, हरकती व निवेदनांसह पारदर्शक, कायदेशीर प्रक्रिया नव्याने सुरू करावी. यासाठी धारावीत जनसुनावणी आयोजित करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. खा. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची सह्याद्रीवर भेट घेतली. माजी मंत्री आ. अस्लम शेख, आ. अमीन पटेल, आ. ज्योती गायकवाड, माजी नगरसेवक मोहसिन हैदर यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. त्यानंतर खा. गायकवाड यांनी हा मास्टर प्लॅन अन्यायकारक असून घरांचे सर्वेक्षण पूर्ण न करता, एमआरटीपी कायद्याचे उल्लंघन करून हा प्लॅन करण्यात आला आहे, अशी टीका केली.
सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह
तीन वर्षांनंतरही केवळ ५६,९७१ घरांचे सर्वेक्षण झाले. त्यामुळे सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्याचा प्लॅननुसार केवळ ७०,००० कुटुंबांचे पुनर्वसन होणार आहे. तर, उर्वरित लाखो धारावीकरांना डम्पिंग ग्राउंड्स, मिठागराच्या जमिनी किंवा मुंबईबाहेर हकलले जाणार. त्यामुळे हे पुनर्वसन नाही, तर सामूहिक पद्धतीने लोकांची केलेली हकालपट्टी आहे. धारावीकरांना अंधारात ठेवून सर्वेक्षणापासून प्लॅनच्या मंजुरीपर्यंत संपूर्ण प्रक्रिया गोपनीयतेने दबावाखाली व फसवणुकीच्या पद्धतीने पार पडली, असा आरोपही खा. गायकवाड यांनी केला.