इतिहास पुसून टाकता येत नाही; निवृत्त न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 10:04 IST2025-03-17T10:03:36+5:302025-03-17T10:04:25+5:30
मार्च १९९३ मध्ये झालेले बॉम्बस्फोट आणि १९९२च्या डिसेंबरमध्ये झालेल्या दंगलीबाबत ‘फोर्टी फोर थाउजंड वर्ड्स’ या ४४ निवडक छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे शनिवारी मुंबई प्रेस क्लबमध्ये श्रीकृष्ण यांनी उद्घाटन केले.

इतिहास पुसून टाकता येत नाही; निवृत्त न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण यांचे प्रतिपादन
मुंबई : मुंबई शहर १९९२-९३ मध्ये जातीय दंगल आणि बॉम्बस्फोटांनी हादरले होते. या घटनांची तीव्रता दाखवणाऱ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनातून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, तसेच यातून येणाऱ्या पिढीला योग्य मार्ग दाखवायला हवा. मात्र कोणताही इतिहास पुसून टाकता येत नाही, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण यांनी केले. मार्च १९९३ मध्ये झालेले बॉम्बस्फोट आणि १९९२च्या डिसेंबरमध्ये झालेल्या दंगलीबाबत ‘फोर्टी फोर थाउजंड वर्ड्स’ या ४४ निवडक छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे शनिवारी मुंबई प्रेस क्लबमध्ये श्रीकृष्ण यांनी उद्घाटन केले.
‘फोर्टी फोर थाउजंड वर्ड्स’ हे प्रदर्शन म्हणजे कसे वागू नये तसेच तुम्ही कसे होऊ नये, याचे उदाहरण आहे. या छायाचित्रांच्या प्रदर्शनातूनही हाच संदेश जनतेपर्यंत पोहोचावा, अशी अपेक्षाही श्रीकृष्ण यांनी व्यक्त केली. मी कट्टर हिंदू आहे. मी धार्मिक असल्यानेच इतर धर्मांवरही प्रेम करू शकतो, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र सरकारने मुंबई दंगलींच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष म्हणून बी. एन. श्रीकृष्ण यांनी काम पाहिले होते.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शन ३० एप्रिलपर्यंत खुले आहे.
न्यायालयात कपाळावर टिळा लावूनच बसत असल्याने लोक निःपक्षपाती न्यायाधीश म्हणून स्वीकारतील का, असा प्रश्न मला पडला होता. मात्र न्यायालयात न्यायमूर्तीचा कोट घालून बसल्यावर तुम्ही हिंदू असता का, असा प्रश्न सरन्यायाधीशांनी विचारला होता. या प्रश्नाला फक्त न्यायमूर्ती म्हणून कार्यरत असल्याचे उत्तर दिल्याचे श्रीकृष्ण यांनी सांगितले.
छायाचित्रांमधून घटनांची दाहकता...
१९९२ मधील दंगल आणि १९९३च्या बाॅम्बस्फोटांमधील विविध घटनांचे चित्रण या छायाचित्रांमधून समोर येते. हातगाड्यांवर रचलेले पार्थिव, छिन्नविच्छिन्न देह आणि त्यांना घेऊन जाणारे मुंबईकर नागरिक, हातात तलवारी घेतलेली माणसे यासारख्या छायाचित्रांमधून दंगल, बॉम्बस्फोटांची दाहकता लक्षात येणारी आहे.