Join us
Daily Top 2Weekly Top 5

"देशाला  माझी गरज आहे ..मला जायलाच हवं...", तो व्हिडिओ कॉलही ठरला अखेरचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 14:50 IST

भारत पाकिस्तान युद्धादरम्यान शहीद झालेल्या मुरली नाईक याने उरीला जाण्यापूर्वी कुटुंबीयांना कॉल केला. युद्ध पाहता आईने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला.

-  मनीषा म्हात्रेमुंबई : 

भारत पाकिस्तान युद्धादरम्यान शहीद झालेल्या मुरली नाईक याने उरीला जाण्यापूर्वी कुटुंबीयांना कॉल केला. युद्ध पाहता आईने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, "देशाला माझी गरज आहे. ते माझं कर्तव्य आहे. मला जायलाच हवं. मी व्यवस्थित परत येईल" असे म्हणत त्याने आईची समजूत काढली. हल्ल्याच्या काही तासांपूर्वीही आईला व्हिडिओ कॉल करत आईशी संवाद साधला. मात्र तो संवाद आणि कॉलही अखेरचा असे कधी वाटले नव्हते असे त्याचे वडील श्रीराम नाईक सांगतात. तसेच मुलगा देशासाठी लढताना शहीद झाला याचा अभिमान असल्याचे ते सांगतात. 

कामराज नगरच्या अवघ्या दहा बाय दहाच्या घरात मुरली लहानाचा मोठा झाला. मुरलीचे वडील सांगतात, उरीला जाण्यापूर्वी मुरली याने कुटुंबियांना कॉल केला. पंजाब येथून जम्मू काश्मिरच्या उरी येथे युद्धासाठी जावे लागणार आहे. माझी काळजी करू नका. मी व्यवस्थित असेल. " मात्र युद्धाच्या बातम्या पाहून आईने त्याला जाण्यास नकार दिला. मुलाला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, "देशाला माझी गरज आहे. ते माझं कर्तव्य आहे. मला जायलाच लागेल" असे सांगून त्याने आईला सांगितले.

घरातील एकुलता एक मुलगा युद्धभूमीवर असताना आमची झोप उडाली होती. मात्र, मुलगा देशासाठी लढतोय याचा अभिमानही होत. रात्री अपरात्री येणाऱ्या कॉलने धडकी भरायची. अखेर, शुक्रवारी पहाटेच्या आलेल्या कॉलने मनातली भीती खरी ठरल्याचे ते सांगतात. 

आईने कॉल घेतला. " हॅलो, मुरली नाईक तुमचा कोण लागतो," मुलगा.. हे सांगताच वडिलांना फोन देण्यास सांगितले. मात्र त्या कॉलने आईला भोवळ आली. वडिलांनी थरथरलेल्या हातानी फोन घेतला. तेव्हा, जम्मू काश्मीरमध्ये मुलगा शहीद झाल्याचे समजताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. 

श्रीराम सांगतात, एकुलता एक मुलगा शहीद झाल्याने धक्का बसला. मात्र, देशासाठी लढताना वीरमरण आल्याने त्याचा अभिमान आहे. आम्हाला बाकी काही नको." 

तो व्हिडिओ कॉलही अखेरचा...हल्ल्याच्या काही तासांपूर्वी गुरुवारी रात्री ८ वाजता मुरली याने व्हिडिओ कॉल केला. अचानक आलेल्या मुलाच्या व्हिडिओ कॉलने आईने चौकशी केली तेव्हा, आता जरासा ब्रेक घेतला आहे. जेवण झालं..थोड्या वेळाने पुन्हा ड्युटीवर जाईल" असे सांगितले. आईनेही काळजी घेत म्हणत व्हिडिओ कॉल ठेवला. मात्र व्हिडिओ कॉल शेवटचा असेल असे कधीच वाटले नव्हते म्हणत आईनेही हंबरडा फोडला.

संक्रांत सोबत साजरी...मुरलीचे मामा लक्ष्मण सांगतात, मुरलीच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. तो जानेवारी महिन्यात घरी आला. आम्ही सर्वांनी एकत्रित संक्रांत साजरी केली. तो नेहमी आई वडिलांना कॉल करायचा. आम्ही त्याला लग्न कधी करणार विचारायचो? तेव्हा तो दोन वर्ष थांबा. त्यानंतर माझ्यासाठी मुलगी बघा. मात्र ते स्वप्नही अपूर्णच राहिले. 

कामराज नगर मध्ये "अमर रहे" चा जयघोष...कामराज नगरच्या प्रवेशद्वाराससह नाईक कुटुंबियांच्या घरापर्यंत मुरली यांना श्रद्धांजली अर्पण केल्याचे बॅनर्स झळकले. मुरली यांना श्रद्धांजली अर्पण करत  "अमर रहे" चा जयघोष स्थानिकांकडून करण्यात आला. त्याचे मित्र श्रीधर नायर सांगतात, तो खूपच चांगला मित्र होता. सुट्टीत कधी तरी भेट व्हायची. आपल्या चाळीतला मुलगा देशसेवेत आहे याचा नेहमीच अभिमान असायचा.

शिवानी कुवर सांगतात, सकाळी मुरली शहीद झाल्याच्या कॉलने धक्का बसला. पण त्यानेही अखेरच्या श्वासापर्यंत देशासाठी लढा देत वीरमरण पत्करले याचा अभिमान आहे. 

टॅग्स :ऑपरेशन सिंदूरपाकिस्तानभारतीय जवानभारत विरुद्ध पाकिस्तान