- मनीषा म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान शहीद झालेल्या मुरली नाईक याने उरीला जाण्यापूर्वी कुटुंबीयांना कॉल केला. युद्ध पाहता आईने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, “देशाला माझी गरज आहे. ते माझं कर्तव्य आहे. मला जायलाच हवं. मी व्यवस्थित परत येईन,” असे म्हणत त्याने आईची समजूत काढली. हल्ल्याच्या काही तासांपूर्वीही आईला व्हिडीओ कॉल करीत आईशी संवाद साधला. मात्र, तो संवाद आणि कॉलही अखेरचा असे कधी वाटले नव्हते, असे त्याचे वडील श्रीराम नाईक सांगतात. तसेच मुलगा देशासाठी लढताना शहीद झाला याचा अभिमान असल्याचे ते सांगतात.
कामराजनगरच्या अवघ्या दहा बाय दहाच्या घरामध्ये मुरली लहानाचा मोठा झाला. घरातील एकुलता एक मुलगा युद्धभूमीवर जात असताना आमची तर झोपच उडाली होती. मात्र, मुलगा देशासाठी लढतोय याचा अभिमानही होता. रात्री-अपरात्री येणाऱ्या कॉलमुळे धडकी भरायची. अखेर, शुक्रवारी पहाटेच्या आलेल्या कॉलने मनातली भीती खरी ठरल्याचे ते सांगतात.
मुलगा शहीद झाल्याचे कळले : आईने कॉल घेतला. ‘हॅलो, मुरली नाईक तुमचा कोण लागतो?’ अशी विचारणा झाल्यावर ‘मुलगा’ हे सांगताच वडिलांना फोन देण्यास सांगितले. मात्र, त्या कॉलने आईला भोवळ आली. वडिलांनी थरथरलेल्या हातांनी फोन घेतला. तेव्हा जम्मू-काश्मीरमध्ये मुलगा शहीद झाल्याचे समजले.