Join us  

मुंबई परिसरात जोरदार पाऊस; ‘विहार तलाव’ भरून वाहू लागला...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 1:40 PM

विहार तलावातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर (९ कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे,

मुंबईतील ‘विहार तलाव’  रविवार सकाळी ९ वाजता भरून‌‌ वाहू लागला आहे‌. गेल्यावर्षी दिनांक ५ ऑगस्‍ट २०२० रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास हा तलाव पूर्ण भरून वाहू लागला होता. पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी विहार तलाव हा सर्वात लहान २ तलावांपैकी एक असून यांपैकी दुसरा तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव आहे. 

विहार तलावातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर (९ कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे.

या तलावाचे बांधकाम सन १८५९ मध्ये पूर्ण झाले. या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ६५.५ लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे १८.९६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे ७.२६ चौरस किलोमीटर एवढे असते. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्‍त पाणीसाठा हा २७,६९८ दशलक्ष लीटर एवढा असतो. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.

टॅग्स :मुंबईपाऊसपाणी