सलग दुसऱ्या दिवशीही मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली. ठाणेरेल्वे स्थानकावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. मुसळधार पावसामुळे सीएसएमटी ते ठाणे आणि दिवा, डोंबिवली, कल्याण या सेक्शनमध्ये लोकल ट्रेन्स उशिराने धावत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.
मुसळधार पावसाने शहरांना झोडपून काढले असतानाच मध्य रेल्वेची वाहतूक देखील कोलमडली. संध्याकाळी सात नंतर मध्य रेल्वेवर ट्रेन्स उशिराने धावत होत्या. भांडुप ते ठाणे आणि त्यापुढे दिव्यापर्यंत रेल्वे रुळात पावसाचे पाणी साचल्याने चारही मार्गवरील दोन्ही दिशांवरील वाहतूक ठप्प झाली होती. पावसाचा जोर कमी होताच रेल्वे वाहतूक कासवगतीने सुरू झाली. त्यामुळे कामावरून घरी जाणाऱ्या लोकांचे हाल झाले.
पारसिक येथे एका ठिकाणी पॉइंट फ्लॅश झाल्याने म्हणजेच तांत्रिक बिघाड झाल्याने २० मिनिटे वाहतूक बंद होती. परंतु नंतर बिघाड दुरुस्त करून वाहतूक सुरू करण्यात आली. मुसळधार पावसामुळे सीएसएमटी ते ठाणे आणि दिवा, डोंबिवली, कल्याण या सेक्शन मध्ये लोकल ट्रेन्स उशिराने धावत आहेत.
अनेक ठिकाणी लोकल अडकून पडल्या असून हजारो प्रवासी विविध स्थानकात अडकले आहेत. दादर, कुर्ला, भांडुप, मुलुंड, ठाणे, दिवा येथे प्रवासी अडकले होते, मिळेल त्या लोकलमध्ये प्रवेश करायला देखील जागा नसल्याने प्रवाशांचे हाल झाले.