Join us  

कसाबने घेतलेल्या टेरर कॅम्पमध्येच त्यांनी घेतलं प्रशिक्षण; पोलिसांच्या हाती महत्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 2:23 PM

दोन लोक यावर्षी एप्रिलमध्ये मस्कतला गेले होते. तेथून त्यांना जहाजातून पाकिस्तानात नेण्यात आले. तेथे ते एका फार्म हाऊसमध्ये राहत होते.

मुंबई: मुंबई आणि दिल्लीत घातपाताचा कट आखणाऱ्या सहा दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यापैकी एका दहशतवाद्याचं मुंबईतील सायन परिसरात वास्तव्य होतं, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. जान मोहम्मद अली शेख, असं अटक करण्यात आलेल्या मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या दहशतवाद्याचं नाव आहे. महाराष्ट्रातील दहशतवादी विरोधी पथकानं मंगळवारी जान मोहम्मदच्या घरी जाऊन तपास सुरु केला आहे. तसेच त्याच्यासोबत राहत असलेल्या साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. 

चौकशीच्या आधारे यूपीमधून तीन जणांना अटक करण्यात आली. यापैकी दोन लोक यावर्षी एप्रिलमध्ये मस्कतला गेले होते. तेथून त्यांना जहाजातून पाकिस्तानात नेण्यात आले. तेथे ते एका फार्म हाऊसमध्ये राहत होते. येथेच त्यांना स्फोटकं बनवण्याचे आणि इतर प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण सुमारे १५ दिवसांचे होते. या प्रशिक्षणानंतर हे लोक तेथून मस्कतला परत आले होते.

अटक करण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी दोन दहशतवाद्यांना पाकिस्तानातील थट्टा टेरर कॅम्पमध्ये ट्रेनिंग देण्यात आली होती. फिदाईन हल्ला करण्याचे ट्रेनिंग दिले होते, लोकांना ओलीस ठेवण्याचे ट्रेनिंग तसेच एकाच वेळे अनेक ठिकाणी कसे हल्ले करायचे, याची ट्रेनिंग दिले गेले असल्याची माहिती समोर आली आहे. याच टेरर कॅम्पमध्ये २६/११ हल्ल्यातील दोषी दहशतवादी अजमल कसाब यानेही ट्रेनिंग घेतली होती.

दरम्यान, सहा जणांकडून स्फोटके व शस्त्रस्त्रेही ताब्यात घेण्यात आली आहेत. प्राथमिक तपासणीत आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशात आणखी दहशतवादी असण्याची शक्यता तपास यंत्रणांनी वर्तवली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान व उत्तर प्रदेशातील काही ठिकाणांची या दहशतवाद्यांकडून रेकीही करण्यात आली होती. दिल्ली स्पेशल सेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दाव केला आहे की, दहशतवाद्यांच्या एका मॉड्युलचा पर्दाफाश झाला आहे. या दहशतवाद्यांचे आणखी काही मॉड्युल देशभरात पसरले असून जवळपास १५ ते २० दहशतवादी असण्याची शक्यता प्राथमिक तपासातून समोर येत आहे. त्यामुळे, संपूर्ण देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. 

१९९३ च्या बॉम्बस्फोटासारखा कट

दिल्ली पोलीस अधिकारी नीरज ठाकूर यांनी सांगितल्याप्रमाणे, दहशतवाद्यांच्या या टीमचं काम सीमेपलीकडून हत्यारं आणून त्याला देशातील विविध राज्यात पोहचवण्याचं होतं. अनीस इब्राहिम हा दाऊद इब्राहिमसारखा १९९३ च्या बॉम्बस्फोटाप्रमाणे कट रचण्याचा प्रयत्नात होता. पाकिस्तानात लपून बसलेल्या दाऊन इब्राहिमविरुद्ध मागील काही वर्षात कठोर कारवाई करण्यात येत आहे. देशात डी कंपनीच्या संपत्तीचा लिलाव केला जात आहे. त्यामुळे दाऊद इब्राहिम खवळला आहे. त्यामुळे आपली ताकद दाखवण्यासाठी ISI सोबत मिळून भारताविरुद्ध षडयंत्र रचण्यासाठी प्लॅनिंग करत आहे. दिल्ली पोलीस आणि यूपी एटीएसनं हे षडयंत्र उधळून लावलं आहे.

टॅग्स :दहशतवादी हल्लादहशतवादी26/11 दहशतवादी हल्लापोलिस