Join us  

बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त हवे; पालकमंत्र्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2021 4:30 PM

पालकमंत्री अस्लम शेख यांनी लोकमतशी बोलताना केली भूमिका स्पष्ट

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांच्याच पार्श्वभूमीवर दोन आयुक्तांची पदं निर्माण करावी, पालकमंत्र्यांची मागणीनागरिकांना होणारी गैरसोय पाहता दोन आयुक्त असणं आवश्यक,पालकमंत्र्यांची भूमिका

मनोहर कुंभेजकरबृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा होणारा विस्तार व वाढणारी लोकसंख्या पाहता बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त असणं गरजेचे आहे. तशी मागणी आपण शहर विकास विभागाकडे केली असल्याची माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी लोकमतला दिली.

मुंबई भाजपाचे प्रभारी व कांदिवली पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार यांनी या संदर्भात महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त असणं गरजेचे आहे या मंत्री अस्लम शेख यांच्यावर मागणीवर जोरदार टीका केली होती. लोकमत ऑनलाईनवर भातखळकर यांचे वृत्त प्रसिद्ध होताच अस्लम शेख यांनी लगेच आपली भूमिका स्पष्ट केली.

"मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून देशातील विविध भागांतून लोक रोजीरोटीच्या शोधात मुंबई शहरात येत असतात. याचाच परिणाम म्हणून शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. वाढणाऱ्या लोकसंख्येला नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही त्या शहरातील महानगरपालिकेची असते. परंतु सध्या महानगरपालिकेसाठी एकच आयुक्त असल्याने नागरिकांचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहतात. शिवाय मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरीकांना विविध प्रशासकीय कामांसंदर्भात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पालिका मुख्यालयात यावे लागते नागरिकांची होणारी ही गैरसोय पाहता मुंबई शहर व उपनगरासाठी दोन पालिका आयुक्त असणं गरजेचे आहे," असे अस्लम शेख म्हणाले.

"पी-उत्तर वॉर्डच्या विभाजनास राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिल्यानंतर आता पालिकेसाठीही दोन आयुक्तांची मागणी जोर धरू लागली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्तांची पद निर्माण करण्यात आल्यास  मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासकीय व्यवहार करणं सोयीचं ठरणार आहे. सध्या मुंबई शहर व उपनगरसाठी दोन जिल्हाधिकारी आहेत याच पार्श्वभूमीवर दोन आयुक्तांची पद निर्माण करावीत," अशी मागणी अस्लम  शेख यांनी केली आहे. 

टॅग्स :मुंबईकाँग्रेसलोकमतकांदिवली पूर्वअतुल भातखळकरभाजपा