Join us  

पत्रलेखनाला चालना मिळण्यासाठी राज्यपाल लिहिणार पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 5:57 PM

नवनवीन तंत्रजानाने जग जवळ येत असले तरी पत्रलेखन हा संवादाचा पाया असून त्याचे विस्मरण होऊन चालणार नाही.

मुंबई - नवनवीन तंत्रजानाने जग जवळ येत असले तरी पत्रलेखन हा संवादाचा पाया असून त्याचे विस्मरण होऊन चालणार नाही. पत्रलेखनाला चालना देण्यासाठी टपाल खात्यातर्फे आयोजित ढाई आखर पत्रलेेखन स्पर्धेत पत्र लिहिणार असल्याची घोषणा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली. चर्चगेट येथील सुंदरबाई सभागृहात टपाल खात्यातर्फे आयोजित मुंबईपेक्स या दोन दिवसीय टपाल तिकीट प्रदर्शनाचे राज्यपालांच्या हस्ते बुधवारी उद्धाटन झाले. 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दिडशेव्या जयंतीचे औचित्य साधून यावेळी गांधी आणि मुंबई या थीमवर प्रदर्शन भरवण्यात आले. यावेळी महात्मा गांधी व महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती यावर विशेष टपाल आवरण प्रकाशित करण्यात आले. 192 फ्रेमद्वारे विविध विषयांची माहिती देणाऱ्या टपाल तिकीटांचे प्रदर्शन भरवण्यात आले असून विद्यार्थ्यांसोबत टपाल तिकीट संग्राहकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे.राज्यपाल म्हणाले,  पत्र लेखन हे भावनात्मक संवाद साधण्याचा मार्ग आहे. मोबाईल व संगणकाद्वारे साधण्यात येणाऱ्या संवादामध्ये भावनात्मकता नसते. यावेळी राज्यपालांनी आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांचे कौतुक  केले. टपाल खाते आधुनिकतेकडे जात असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. महात्मा गांधींचे पाय नेहमी जमीनीवर होते,  हात नेहमी वर्तमानात होते तर डोके नेहमी भविष्यामध्ये असायचे त्याप्रमाणे सर्वांनी वागण्याची गरज आहे. पत्रलेखन हा संवादाचा पाया आहे. तंत्रजान बदलत राहील मात्र पाया विसरता कामा नये असा सल्ला त्यांनी दिला. ढाई आखर मध्ये आपण पत्र लिहिणार असून इतरांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संजीव कपूर,  उषा ठक्कर, महाराष्ट्र व गोवाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल हरीश अग्रवाल, मुंबईच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे,  संचालिका केया अरोरा व इतर मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनाच्या आयोजिका व मुंबई विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे म्हणाल्या, यंदा मुंबई विभागात वीस शाळांमध्ये फिलँटँली क्लब स्थापन करण्यात आले त्यातील 36 विद्यार्थी विद्यार्थिनींनी या प्रदर्शनात सक्रिय सहभाग घेतला. या जिल्हा स्तरीय प्रदर्शनातील विजेत्यांना राज्य स्तरावर व राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांनी शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त छंद जोपासणे गरजेचे आहे. टपाल तिकीट जमवण्याच्या छंदातून त्यांना दोन्ही बाबी करणे शक्य होते. पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी यावेळी प्रथमच झाडांच्या सुकलेल्या पानांचे विशेष आवरण तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.या आवरणात सुगंधीत बनवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील  खाद्यसंस्कृतीचे दर्शन करण्यासाठी विशेष आवरण प्रकाशित करुन स्त्रियांच्या कष्टाला दाद देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आयआयटी मुबंईच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या  रोबोटद्वारे यावेळी फित कापण्यात आली. दोन परीक्षकांद्वारे प्रदर्शनातील उत्कृष्ट प्रदर्शनाची निवड करण्यात येणार असून त्यांना पारितोषिक  देण्यात येणार आहे.

टॅग्स :पोस्ट ऑफिसमहाराष्ट्र