Join us

आंदोलनाबाबत सरकारची भाषा मायावी राक्षसाची - शेलार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 05:42 IST

आझाद मैदानात आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांची आशीष शेलार यांनी भेट घेतली. यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते

मुंबई : एसटीच्या प्रश्नावर मायावी राक्षसासारखे हे सरकार शब्दांत सामान्यांना भुलवत आहे.  यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. काळीज नसलेले हे सरकार आहे. सरकारने चर्चा करत सोपा मार्ग काढावा. सरळ विलिनीकरण करा, त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करा. ४० जणांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेले हे सरकार रक्तपिपासू असल्याची टीका भाजपा नेते आशिष शेलार यांनी रविवारी केली.

आझाद मैदानात आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांची आशीष शेलार यांनी भेट घेतली. यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते. यावेळी शेलार म्हणाले की, शासकीय कर्मचाऱ्याला जे फायदे मिळतात, ओळख मिळते ती द्या, एवढीच मागणी आहे. यासाठी केवळ एक वाक्याचा जीआर काढायचा आहे. राज्य सरकारला सर्व सहकार्य करायची आमची तयारी आहे. ही लढाई केवळ एसटी  कर्मचाऱ्यांची नाही तर महाराष्ट्रातल्या गोरगरीब, दलित, पीडित, वंचित समाजाला न्याय देण्याची लढाई आहे. आझाद मैदानासमोर मुंबई महापालिका आहे. जिथे ८० हजार कोटींचे फिक्स डिपॅाझिट आहेत, पण इथे मराठी माणूस आंदोलन करतोय, त्यांना लाईट आणि पाण्याची ही सुविधा दिली जात नाही. या सत्ताधाऱ्यांना लाज कशी वाटत नाही, असा सवालही त्यांनी केला. सोमवारी (दि. १५) यासाठी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :एसटी संपआशीष शेलार