Join us  

सरकार आहे की तमाशा, आता शांत बसणार नाही, फडणवीसांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 3:38 PM

राज्य सरकारविरोधी भूमिका घेत आंदोलन करणार आहात का, असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला होता. त्यावर, आता आम्ही शांत बसणार नाही, काय करणार हे लवकरच सांगण्यात येईल, असे फडणवीस यांनी म्हटले.

ठळक मुद्देराज्य सरकारविरोधी भूमिका घेत आंदोलन करणार आहात का, असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला होता. त्यावर, आता आम्ही शांत बसणार नाही, काय करणार हे लवकरच सांगण्यात येईल, असे फडणवीस यांनी म्हटले.

मुंबई - राज्य सरकारच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशन घेण्याचा निर्णयाचा निषेध करत राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर विविध मुद्द्यांवरुन जोरदार हल्लाबोल केला आहे. 'बारमध्ये गर्दी झालेली चालते, पक्ष कार्यालयाच्या उदघाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको?', असा रोखठोक सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. तसेच, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षणावरुनही राज्य सरकारला लक्ष्य केलं असून इशाराही देण्यात आला आहे. 

राज्य सरकारविरोधी भूमिका घेत आंदोलन करणार आहात का, असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला होता. त्यावर, आता आम्ही शांत बसणार नाही, काय करणार हे लवकरच सांगण्यात येईल, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, लोकशाहीची हत्या होत असेल, जनतेच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा मांडण्यसाठी कुठलंही फोरम उरत नसेल, सरकार अशी मुस्कटदाबी करत असेल तर, या मुस्कटदाबी विरोधातील आवाज आम्हाला बनावच लागेल, असे फडणवीस यांनी म्हटलं. 

सरकार आहे की तमाशा

तीन पक्षांमध्ये विसंवाद आहे, तीन पक्षांत एममेकांबद्दल विश्वास नाही हे सर्व स्पष्टच आहे. पण, तिघांच्या भांडणात जनतेला का खड्ड्यात टाकताय. तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, गळे मिळा. पण तुमच्या राजकारणासाठी जनतेचा बळी देणं अत्यंत चुकीचं आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं आरक्षण गेलं, मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात हार स्विकारावी लागली. पण, या सरकारचे मंत्री स्वत:च मोर्च काढतात अन् कोर्टात बाजू मांडत नाहीत. त्यामुळे हे सरकार आहे की तमाशा.. अशा शब्दात फडणवीसांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.   

केवळ दोन दिवसांत अधिवेशन गुंडाळायचं

राज्याच्या अधिवेशनाचे दिवस जवळ आले की राज्यात कोरोना वाढतो असं आमच्या लक्षात आलं आहे. राज्यासमोर इतके गंभीर प्रश्न निर्माण झालेले असताना हे सरकार फक्त दोन दिवसांचं अधिवेशन जाहीर करुन राज्यातील जनतेचा अपमान करतंय. लोकशाही बासनात गुंडाळायची कार्यपद्धती या सरकारनं सुरू केली आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसकोरोना वायरस बातम्यासरकारभाजपामराठा आरक्षण