मुंबई :मुंबईत सोमवारी झालेल्या पावसामुळे जो गोंधळ उडाला, जी परिस्थिती ओढवली, त्याला सरकार जबाबदार आहे. त्यामुळे या पावसात ज्यांच्या घरांचे, दुकानांचे नुकसान झाले आहे, त्यांना राज्य सरकारच्या तिजोरीतून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेना भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
पहिल्या पावसानंतर सरकार यातून काहीतरी शिकेल, असे वाटत होते. मुंबईकरांना या पावसाळ्यात काही त्रास होणार नाही, अशी अपेक्षा होती; पण, अनेक ठिकाणी पाणी साचले होते. भाजपच्या आदेशाने वांद्रे पश्चिम, अंधेरी, दहिसर, बोरीवली भागांत खोदकाम करून ठेवले आहे. मंत्रालयाबाहेर पाणी साचले. ब्रीच कॅन्डी रुग्णालयाजवळ बांधलेला रस्ता खचला. आम्ही पूरमुक्त करून दाखवलेला हिंदमाता, गांधी जंक्शन भाग यांनी बुडवून दाखवला, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.