अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करण्यासाठी ई-पास द्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 20:27 IST2020-06-19T20:27:09+5:302020-06-19T20:27:35+5:30
विविध सरकारी व सहकारी बँका, पतपेढ्या, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, बीएसएनएल आणि पत्रकार यांना लोकल सेवेतून दूर ठेवले आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करण्यासाठी ई-पास द्या
मुंबई : अत्यावश्यक सेवेतील निवडक कर्मचारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर लोकल सुरू करण्यात आली आहे. मात्र विविध सरकारी व सहकारी बँका, पतपेढ्या, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, बीएसएनएल आणि पत्रकार यांना लोकल सेवेतून दूर ठेवले आहे. त्यामुळे या सर्व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांसाठी रेल्वेतून प्रवास करण्यासाठी ई- पास देण्याची मागणी खासदार अरविंद सावंत यांनीकेली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. राज्य सरकार आणि महापलिकतेच्या माध्यमातून मुंबईच्या लोकल रेल्वे प्रवास करण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांना इ-पास देणेबाबत मुंबई महापालिकेने एक परिपत्रक जाहीर केलेले आहे. त्यामध्ये विविध आवश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आस्थापनांची नावे नमूद करण्यात आलेली आहेत. ज्यामध्ये विविध सरकारी व सहकारी बँका, पतपेढ्या, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, बीएसएनएल, एसटी महामंडळाचे कर्मचारी, टपाल खाते, माझगाव डॉक, नेव्हल डॉक, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि पत्रकार या सर्व आस्थापनामंधील कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेमधील कर्मचारी आहे. त्यामुळे यांना रेल्वेतून प्रवास करण्यासाठी इ- पास देण्यात यावा, अशी मागणी खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकाव्दारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.