Join us
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव, दहीहंडीत दाखल झालेले गुन्हे मागे, सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 14:17 IST

राज्य सरकारचा निर्णय; यंदाचे गुन्हे मात्र कायम राहणार

लोकमत न्यूज नेटवर्क   मुंबई : गणपती आणि दहीहंडी उत्सवाच्या कालावधीत कायदेशीर सूचनांचे उल्लंघन झाल्यामुळे तसेच कोरोनाकाळात विविध कायद्यांचे उल्लंघन झाल्याबाबतचे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर राजकीय पक्ष आणि संघटना यांनी सामाजिक हितासाठी केलेल्या आंदोलनांमुळे दाखल करण्यात आलेले गुन्हेही मागे घेण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

गणेशोत्सव आणि दहीहंडी या उत्सवादरम्यान कायदेशीर सूचनांचे पालन न झाल्याने ३१ मार्च २०२२ पर्यंत दाखल झालेले खटले मागे घेण्याचे या आदेशात म्हटले आहे. कोरोनानंतरच्या निर्बंधमुक्त वातावरणात झालेल्या गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवादरम्यान दाखल झालेले गुन्हे कायम राहणार आहेत. सामाजिक हिताची कामे करताना झालेल्या कायद्याच्या उल्लंघनामुळे काही गुन्हे झालेले असतात. त्यामुळे त्यात जीवितहानी झालेली नसेल, तसेच पाच रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालेले नसेल, असे गुन्हे मागे घेण्याबाबत शिफारशीवरून हे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झाला आहे.

काेराेना काळातील हे गुन्हे हाेणार रद्दकोरोनाकाळात अनेक नागरिकांकडून साथरोग प्रतिबंधक आणि नियंत्रण तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन झाले. त्यामुळे त्यांच्यावर दाखल खटले मागे घेण्यात येणार आहेत. मात्र यात फ्रंटलाइन वर्कर्स किंवा सरकारी कर्मचारी यांच्यावर हल्ले झालेले नसावेत. तसेच अशा गुन्ह्यात सार्वजनिक मालमत्तेचे पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालेले नाही, असेच गुन्हे मागे घेण्यात येतील. २१ मार्च २०२० ते ३१ मार्च २०२२ या दरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबतच हा आदेश लागू राहणार आहे.

टॅग्स :एकनाथ शिंदेकोरोना वायरस बातम्या