मुंबई : गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुकांत मुंबई शहर आणि उपनगरात डीजेसोबत बेंजोचाही दणदणाट कानी पडला. सोबतच फटाक्यांची आतषबाजी यात भर घालत होती. विशेषत: दहाव्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत ठिकठिकाणी वाद्यवृंद बंद केली तरी दिवसासोबत रात्री पाऊस आणि ध्वनी प्रदूषण नोंदविले गेले. मात्र, यंदा ध्वनी प्रदूषणाची नोंद झाली नाही. गेल्या २२ वर्षांपासून उत्सवकाळात आवाजाची तीव्रता मोजूनही शासन दरबारी नोंद घेतली जात नसल्याने या फाउंडेशनने गणेशोत्सवात आवाजाचे प्रमाण मोजले नाही.
आवाज फाउंडेशनकडून मुंबई शहर आणि उपनगरातील ध्वनी प्रदूषण मोजण्यास २००३ साली सुरुवात झाली. याबाबत अधिक माहिती देताना सुमेरा अब्दुलअली यांनी सांगितले, लाऊडस्पीकरमुळे आवाज वाढतो हे सगळ्यांना माहिती आहे. एवढी वर्षे काम केल्यानंतर न्यायालयाचे आदेशही आले आहेत.
आता तर लोकांनाही तक्रार कशी करायची, हे माहीत झाले आहे, तसेच ध्वनी प्रदूषण करायचे नाही, हे मंडळांना माहित आहे. ईद-ए-मिलादच्या वेळीही हे सगळ्यांना ठाऊक असते. त्यामुळे सारखे आवाजाची मात्रा मोजल्यानंतर त्यातून फलितही निघाले पाहिजे.
...तर मोजणीत नेमके आकडे मिळाले नसते
मुंबईत शनिवारी दिवसभर पाऊस होता. पाऊस असताना आवाजाची नोंद नीट होत नाही. कारण वाद्यवृंदांचा आवाज जेव्हा मोजला जातो तेव्हा त्यास आसपासच्या आवाजाची नोंद होते. विसर्जनाला पाऊस असल्याने पाऊस आणि आवाजाची नोंद एकत्रित झाली असती तर ध्वनी प्रदूषणाबाबतचे नेमके आकडे सांगता आले नसते.