Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसादात विष कालवणाऱ्या साधूसह चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 08:30 IST

कर्नाटकमधील दुर्घटना : वरिष्ठांवर सूड उगवण्यासाठी केले कारस्थान

म्हैसूर : कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यात सुलवाडी येथील किचीगुत्तू मारम्मा मंदिरात प्रसादातून विषबाधा होऊन १५ भाविकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी या मंदिराच्या एका कनिष्ठ साधूसह एकूण चौघांना अटक केली आहे. या साधूने त्याच्या वरिष्ठाचा सूड उगवण्यासाठी नोकरांना हाताशी धरून प्रसादात कीटकनाशक मिसळण्याचे कारस्थान केले, असा पोलिसांचा दावा आहे.

दक्षिण क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक के. व्ही. शरत चंद्र यांनी अटक केलेल्यांची नावे इम्मादी महादेव स्वामी ऊर्फ देवण्णा बुद्धी (५२ वर्षे), अंबिका (३२), तिचा पती महादेवस्वामी ऊर्फ मडेशा (४६) आणि दोद्दा थम्माडी ऊर्फ दोद्दय्या (३५) अशी दिली. देवण्णा बुद्धी हा सुलवाडी मारम्मा मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे, तर मडेशा हा व्यवस्थापक व दोद्दय्या माजी कर्मचारी आहे. शरत कुमार म्हणाले की, मंदिर ट्रस्टचे बहुसंख्य विश्वस्त ज्येष्ठ साधू गुरुस्वामी यांचे पाठीराखे आहेत. कनिष्ठ स्वामी देवण्णा याचे केवळ मंदिर ट्रस्टचाच नव्हे तर सलूर मठाचाही अध्यक्ष होण्याचे मनसुबे होते; पण विश्वस्त गुरुस्वामींच्या विश्वासातील असल्याने त्याचा या वरिष्ठ स्वामींवर राग होता. त्यामुळे त्याने त्यांना बदनाम करण्याचे हे कारस्थान रचले. ट्रस्टकडे पुरेसे पैसे नसूनही देवण्णाने मंदिराच्या समोर नवे गोपूर बांधण्याची योजना त्यांच्या गळी उतरविली. याच गोपुराच्या भूमिपूजनाच्या धार्मिक कार्यक्रमानंतरच्या प्रसादाच्या जेवणात विषबाधा होऊन १५ भाविक मरण पावले व १०० हून अधिक आजारी पडले. या कार्यक्रमाला त्याने गुरुस्वामींना निमंत्रित केले. (वृत्तसंस्था)स्वयंपाक्यांना पिटाळलेतपासातून उघड झालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी असा दावा केला की, गोपूरपूजनाच्या धार्मिक विधींमध्ये गुरुस्वामींसोबत सहभागी न होता देवण्णा स्वयंपाकाच्या ठिकाणी घुटमळत राहिला. वीरण्णा, लोकेश व पुत्तुस्वामी हे तीन आचारी स्वयंपाक करीत होते.वीरण्णा आंघोळ करायला गेल्यावर देवण्णाने लोकेश व पुत्तुस्वामी यांना ‘गुरुस्वामींना काय हवे ते नको पाहण्यासाठी तिकडेच थांबा’, असे सांगून पिटाळले. वीरण्णा आंघोळ करून परत येईपर्यंत वीरण्णाने अंबिका, दोयय्या व व मडेशा यांना हाताशी धरून आपले कारस्थान पार पाडले. कोणी पाहत नाही ना याकडे लक्ष ठेवण्याचे काम मडेशाने केले व अंबिका आणि दोदय्या यांनी चुलीवर उकळत असलेल्या टोमॅटोच्या सारामध्ये कीटकनाशक मिसळले.

टॅग्स :अटकगुन्हेगारी