दिवसा जंगलांना लावताहेत आगी
By Admin | Updated: May 19, 2014 05:14 IST2014-05-19T05:14:13+5:302014-05-19T05:14:13+5:30
डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात जंगलामध्ये आग लावण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

दिवसा जंगलांना लावताहेत आगी
कासा : डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात जंगलामध्ये आग लावण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे जंगले नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तालुक्यातील उर्से, साये, दाभोण, साखरे, महालक्ष्मी, आवढाणी, ओसरविरा, बापूगांव, धरमपुर, आंबोली, सोनाळे, खाणीव, पावन, गांगणगाव, वांगर्जे, सारणी, शिसने, निकावली तर कासा भागातील बºहाणपूर, सोमटा, आंबेळा, नानीवली, मेंढवण आदी भागात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. परंतु पावसाळ्यानंतर जंगलातील ससा, हरीण, रानडुक्कर आदी प्राण्यांची शिकार करण्यासाठी आजुबाजूच्या परिसरातील काही हौशी शिकारी रात्रीच्या वेळी व दिवसा जंगलांना आगी लावतात. पावसाळ्यानंतर जंगलातील गवत पालापाचोळा सुकून जातो. त्यामुळे एखाद्या ठिकाणी लावलेली आग (वणवा) सर्व बाजुने वेगाने वाढत जाते. त्यामुळे तीन ते चार दिवस ही आग सतत पेटत राहते. त्यामुळे जंगलातील वन्यजीव व वनस्पती खाक होतात. जंगलात साग, खैर, शिसव, बाभूळ आदी महत्त्वाचे व दुर्मिळ होत चाललेल्या वनस्पती या आगींमुळे नष्ट होत आहेत, त्याचप्रमाणे छोटे-मोठे प्राणी, त्यांची वस्तीस्थाने आगीत नष्ट होतात, तर पक्ष्यांची घरटी व पिल्लेही आगीत होरपळून जातात. त्यामुळे जंगलातील वनस्पती, प्राणी दिवसेंदिवस नष्ट होत आहेत. वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर असून जंगलही बोडकी पडली आहेत, मात्र या घटनांकडे लक्ष न दिल्याने वणवे लावण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. (वार्ताहर)