पाचपट मोबदला अन् घरासाठी भूखंड, गारगाई बाधितांसाठी पुनर्वसन पॅकेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 14:54 IST2026-04-12T14:50:04+5:302026-04-12T14:54:23+5:30
Mumbai News: मुंबईच्या पाणीपुरवठ्यातील तफावत दूर करण्यास सहायक ठरणाऱ्या गारगाई प्रकल्पाला मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती सभा आणि पालिका सभागृहाने मंजुरी दिल्याने हा प्रकल्प खऱ्या अर्थाने मार्गी लागणार आहे.

पाचपट मोबदला अन् घरासाठी भूखंड, गारगाई बाधितांसाठी पुनर्वसन पॅकेज
मुंबई - मुंबईच्या पाणीपुरवठ्यातील तफावत दूर करण्यास सहायक ठरणाऱ्या गारगाई प्रकल्पाला मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती सभा आणि पालिका सभागृहाने मंजुरी दिल्याने हा प्रकल्प खऱ्या अर्थाने मार्गी लागणार आहे. हा धरण प्रकल्प पालघरच्या ग्रामीण भागात उभारला जात असल्याने पुनर्वसनाचे पॅकेज ठरवताना समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शहर आणि ग्रामीण, अशी विभागणी करण्याचा व्याप वाचला आहे. एकूणच या प्रकल्पातील बाधितांच्या पुनर्वसनाचे पॅकेज तयार झाले असून प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात होईल.
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळ गारगाई नदीवर हे धरण बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे ओगदे, खोडदे ही गावे पूर्णतः बाधित होणार असून तिलमाळ, पाचघर, फणसगाव, आमले ही गावे अंशतः बाधित होणार आहेत. धरणासाठी सुमारे ४२६ हेक्टर खासगी जमीन संपादित करावी लागणार आहे. भूसंपादन आणि पुनर्वसनासाठी महापालिकेला २७७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. गावातील देवळे आणि अन्य महत्त्वाची ठिकाणेही स्थलांतरित करण्यात येणार आहेत.
असे आहे पुनर्वसनाचे पॅकेज
२०१३च्या केंद्र सरकरच्या कायद्याप्रमाणे चारपट व राज्य सरकारच्या थेट खरेदी परिपत्रकानुसार एक पट, असे मिळून पाच पट मोबदला. बाधितांना त्यांच्या जमिनीच्या पाचपट मोबदल्यासह पुनर्वसन, घरासाठी २५० चौरस मीटरचा भूखंड व २५० चौ. फूट बांधकाम रक्कम.
जमीन मूल्य सोडून १० लाख रुपये. म्हणजेच १० लाख, जमीन मूल्य आणि पाचपट मोबदला.
कुटुंबातील एका सदस्याला नोकरी, नोकरी नको असल्यास ५ लाख रुपये.
सर्व प्रकल्पबाधित अनुसूचित जमातीतील असल्याने ५० हजार अतिरिक्त भत्ता.
भूमिहीनांना किमान एक एकर जमीन आणि १० लाख