सीआरझेड मर्यादा कमी केल्यानं मुंबईतील कोळीवाडे, गावठाणे आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 20:43 IST2018-04-25T20:28:13+5:302018-04-25T20:43:28+5:30
मासेमारी धोक्यात येण्याच्या भीतीनं मच्छिमार संघटना आक्रमक

सीआरझेड मर्यादा कमी केल्यानं मुंबईतील कोळीवाडे, गावठाणे आक्रमक
मुंबई: मुंबईसह राज्यातील किनारा संरक्षणाची मर्यादा 50 मीटर करण्यात आल्यानं मुंबईतील 38 कोळीवाडे व 189 गावठाणं आक्रमक झाली आहेत. सीआरझेडमध्ये होऊ घातलेल्या बदलामुळे मासेमारी, पर्यावरण, समाजजीवनावर मोठा परिणाम होणार असून याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे. शासनाच्या या निर्णयामुळे मच्छिमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार असल्यानं समाजाच्या सर्व संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक उद्या वेसावे इथे संध्याकाळी होणार आहे.
कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उद्या मच्छिमार संघटनांची बैठक होणार आहे. वारंवार करण्यात आलेल्या बदलांमुळे आधीच सीआरझेडची तीव्रता झालेली आहे आता शंभर मीटरची मर्यादा पन्नास मीटरवर आणल्यास त्याचे विपरित परिणाम मासेमारी आणि सागरी पर्यावरणावर होतील, अशी भीती मच्छिमारांच्या संघटनांकडून व्यक्त होत आहे. या विरोधात एकत्रित आंदोलन उभारण्याच्या दृष्टीकोनातून मच्छिमारांच्या संघटनांची बैठक होणार आहे.