लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई विद्यापीठाने ३ व ४ वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ दिली असून आता विद्यार्थ्यांना २६ मेपर्यंत ऑनलाइन नाव नोंदणी करता येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी पहिली गुणवत्ता यादी २७ मे रोजी जाहीर केली जाणार आहे. विद्यापीठाशी संलग्न शैक्षणिक विभाग आणि महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये, मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांसाठीही वेळापत्रक जाहीर केले आहे.
विद्यापीठाने ८ मेपासून ऑनलाइन नाव नोंदणीला सुरुवात केली असून आतापर्यंत यामध्ये २,२५,५५६ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली आहे. त्यातील १,४५,०८७ एवढ्या विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरून विविध अभ्यासक्रमांसाठी ५,०९,५७८ एवढे अर्ज सादर केले आहेत.
आता नाव नोंदणीला मुदतवाढ दिल्याने यात आणखी भर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. २०२५-२०२६ साठी ३ वर्षीय पदवी अभ्यासक्रम, ४ वर्षीय ऑनर्स/ऑनर्स विथ रिसर्च, ५ वर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री अँड मल्टीपल एग्जिट यानुसार ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.
सर्व महाविद्यालयांनी वेळापत्रक, तसेच प्रवेश क्षमता, आरक्षणाचे नियम आणि अभ्यासक्रमांच्या पात्रतेनुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे.
या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू
मुंबई विद्यापीठाने बीए, बीएससी, बीकॉम, बीएएमएमसी, बीएसडब्ल्यू, बीए (फिल्म टेलिव्हिजन अँड न्यू मीडिया प्रोडक्शन) आदींसह विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे.
ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया (विद्यापीठाच्या संकेतस्थळावर)
– ८ ते २६ मे पहिली गुणवत्ता यादी – २७ मे कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणा – २८ ते ३० मे दुसरी गुणवत्ता यादी – ३१ मे कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणा – २ ते ४ जूनतिसरी गुणवत्ता यादी - ५ जूनकागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणा –६ जून ते १० जूनवर्गाची सुरुवात - १३ जून
अकरावी प्रवेश प्रक्रिया मोफत करण्याची मागणी
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २१ मे रोजी तांत्रिक अडचणींमुळे ठप्प झाली होती. शिक्षण विभागाने पूर्वतयारी केली नसल्यामुळेच विद्यार्थ्यांना फटका बसला. याप्रकरणी सॉफ्टवेअर कंपनीवर कारवाई करावी. विद्यार्थ्यांना ऑनलाइन, ऑफलाइन प्रवेशाची मुभा देऊन प्रवेश प्रक्रिया मोफत करावी, अशी मागणी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन या विद्यार्थी संघटनेने केली आहे.
शासकीय यंत्रणा खाजगी कंपन्यांच्या हातातील बाहुले बनतात. यापुढे तांत्रिक अडथळा येणार नाही, अशी हमी शिक्षण विभागाने द्यावी, अशी मागणी संघटनेचे राज्य सचिव प्रतीक्षा ढोके यांनी केली.