सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास ५०० पासून २५ हजार दंड, महापालिकेचा मसुदा तयार; १९ वर्षांनंतर घनकचरा व्यवस्थापनाच्या उपविधीत बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 13:21 IST2025-04-01T13:21:02+5:302025-04-01T13:21:20+5:30
Mumbai सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने दंडाच्या रकमेत घसघशीत वाढ केली आहे. कचरा जाळणे, डेब्रिज वाट्टेल तेथे टाकणे, कचऱ्याचे वर्गीकरण न करणे, घरगल्ल्या स्वच्छ न ठेवणे, उघड्यावर अंघोळ करणे, अशा विविध प्रकारे अस्वच्छता केल्यास वाढीव दंड भरावा लागणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास ५०० पासून २५ हजार दंड, महापालिकेचा मसुदा तयार; १९ वर्षांनंतर घनकचरा व्यवस्थापनाच्या उपविधीत बदल
मुंबई - सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने दंडाच्या रकमेत घसघशीत वाढ केली आहे. कचरा जाळणे, डेब्रिज वाट्टेल तेथे टाकणे, कचऱ्याचे वर्गीकरण न करणे, घरगल्ल्या स्वच्छ न ठेवणे, उघड्यावर अंघोळ करणे, अशा विविध प्रकारे अस्वच्छता केल्यास वाढीव दंड भरावा लागणार आहे. मुंबई महापालिकेने जवळपास १९ वर्षांनंतर घनकचरा व्यवस्थापनाच्या उपविधीत बदल केले असून, दंडाची रक्कम ५०० पासून २५ हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा मसुदा तयार केला आहे.
याआधी २००६ साली उपविधी तयार करण्यात आले होते. त्यात बदल करून कचरा संकलन कर आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, असे दोन मसुदे तयार केले आहेत. सार्वजनिक स्वच्छतेमध्ये सामान्य व्यक्ती ते व्यावसायिक आस्थापना यांचा समावेश आहे.
मागील वर्षीपासून विशेष मोहीम
वाढते प्रदूषण आणि अस्वच्छता नियंत्रणात ठेवण्यासाठी पालिकेने मागील वर्षीपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेची व्याप्ती वाढवण्यावर पालिकेचा भर आहे. सार्वजनिक ठिकाणची स्वछता याचबरोबर पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाची स्वच्छता, तसेच शाळा-कॉलेज आणि सार्वजनिक क्रीडांगणे या ठिकाणीही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.
स्वच्छता मोहिमेला कायद्याचे बळ देण्यासाठी जुन्या कायद्यात बदल करण्यात आले आहेत. अस्वच्छता करणाऱ्यांचे २० प्रकार करण्यात आले आहेत. वर्गवारीनुसार दंडाच्या रकमेत वाढ प्रस्तावित आहे.