अल्पसंख्याक दर्जावरुन जैन समाजात रणकंदन; मंत्री लोढा यांच्या विधानाने नाराजीचे सूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 13:57 IST2026-04-07T13:52:42+5:302026-04-07T13:57:33+5:30
मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विधानावर ललित गांधींचा आक्षेप

अल्पसंख्याक दर्जावरुन जैन समाजात रणकंदन; मंत्री लोढा यांच्या विधानाने नाराजीचे सूर
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: जैन धर्मियांनी अल्पसंख्याक दर्जा ठेवावा की, सोडावा याविषयावर राज्यात रणकंदन माजले आहे. एका बाजूला राज्याचे कॅबिनेटमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन धर्म हा हिंदू संस्कृतीचा भाग आहे आणि त्याने अल्पसंख्याक दर्जा सोडण्याचा विचार करावा, असे विधान मुंबईत केले. यावर संपूर्ण समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मंत्री लोढा यांनी समाजातील कोणालाही विश्वासात न घेता हे विधान केल्यामुळे जैन समाजात त्यांच्या विधानावर तीव्र नाराजीचे सूर उमटत आहेत.
जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी आज मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेतला आहे. ललित गांधी म्हणतात, ‘हे विधान अज्ञानातून केलेले आहे किंवा एखाद्या ठरवून आखलेल्या भूमिकेचा भाग आहे. जैन धर्म हा भारतातील एक स्वतंत्र प्राचीन तत्वज्ञान आहे. हिंदू धर्माची शाखा किंवा उपशाखा नाही. जैन धर्मियांना मिळालेला अल्पसंख्याक हा दर्जा आमचा घटनात्मक अधिकार आहे. आमच्या प्राचीन वारशाचे जतन करण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे’.