BMC Election News: मागील काही वर्षांपासून प्रशासक राज असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीचा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने मोकळा झाला आहे. त्यामुळे मुंबईतील राजकारण तापू लागले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनेही महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून, मुंबई अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी घेतला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला महाराष्ट्रातील प्रलंबित असलेल्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते तयारीला लागल्याचे दिसत आहे. ठाकरेंची शिवसेनाही ९ जूनपासून रणशिंग फुंकणार आहे.
ठाकरेंच्या प्रचाराची लाईन, 'लढा आपल्या मुंबईचा'
ठाकरेच्या शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरू असून, आता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यातून ठाकरेंची शिवसेना निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे.
वाचा >>मुंबईकरांवर तात्पुरता ‘कर’भार? मालमत्ता कराची वाढीव दराने बिले
प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात 'लढा आपल्या मुंबईचा' अशी लाईन ठरली आहे. मुंबई सुरू असलेल्या वेगवेगळ्या प्रकल्प आणि विकासकामांवरून ठाकरेंची शिवसेना महायुती सरकारला लक्ष्य करताना दिसत आहे. लढा आपल्या मुंबईचा या प्रचार मोहिमेतून मुंबई अस्मितेच्या मुद्द्यावर जोर दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
९ जून रोजी शिवसेनेचा मेळावा होणार आहे. मुलुंडच्या कालिदास सभागृहामध्ये हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यातूनच शिवसेना प्रचाराला सुरूवात करणार आहे. या मेळाव्यात कोणते मुद्दे अधोरेखित केले जाणार, याकडेही सगळ्यांचेच लक्ष असणार आहे.
शिवसेना फुटीनंतर पहिलीच निवडणूक
मुंबई महापालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. पण, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. दोन वेगवेगळे पक्ष झाले असून, मूळ शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता मिळालेली आहे.
राज्यातील इतर भागाबरोबरच मुंबईतही अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. अनेक माजी नगरसेवक शिंदेंसोबत गेले आहेत. त्यामुळे पुन्हा पक्षाला बळकट करून मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला चांगले यश मिळाले. पण, त्यानंतर काही महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत निराशा झाली होती.