मुंबईत उद्यापासून शेतकरी साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 04:58 IST2018-01-30T04:57:56+5:302018-01-30T04:58:10+5:30

कृषी क्षेत्रात नव्याने निर्माण झालेले प्रश्न, भेडसावणाºया समस्यांची उकल साहित्यातून व्हावी, या उद्देशाने आयोजित चौथे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन बुधवारी, ३१ जानेवारीला मुंबईत पार पडणार आहे.

 Farmer Sahitya Sammelan from tomorrow in Mumbai | मुंबईत उद्यापासून शेतकरी साहित्य संमेलन

मुंबईत उद्यापासून शेतकरी साहित्य संमेलन

मुंबई : कृषी क्षेत्रात नव्याने निर्माण झालेले प्रश्न, भेडसावणाºया समस्यांची उकल साहित्यातून व्हावी, या उद्देशाने आयोजित चौथे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन बुधवारी, ३१ जानेवारीला मुंबईत पार पडणार आहे. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात पार पडणा-या या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. विठ्ठल वाघ यांची निवड झाली असून, उद्घाटन अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते होईल, अशी माहिती संमेलनाचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रा. रमेश झाडे यांनी दिली.
मुंबई मराठी पत्रकार संघात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत व्यवस्थापन समितीने संमेलनाची माहिती दिली. या वेळी प्रा. झाडे म्हणाले की, या संमेलनाच्या माध्यमातून नवसाहित्यिकांना एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचे प्रयोजन आहे. स्वागताध्यक्ष अभिजित फाळके आणि प्रमुख पाहुणे म्हणून सरोजताई काशीकर, रामचंद्र बापू पाटील हे उपस्थित राहणार आहेत. बुधवारी सकाळी ९.३० वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. संमेलनात ‘आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि स्वामिनाथन आयोग’, ‘आलं वरिस राबूनं, आम्ही मरावं किती?’, ‘शेतकरीविरोधी कायद्यांचे जंगल’, ‘चला पुन्हा आयुष्याच्या पेटवू मशाली’ अशा विविध विषयांवरील ४ परिसंवाद होणार आहेत. ‘शेतकरी कवी संमेलन’ आणि ‘शेतकरी गझल मुशायरा’ असे दोन स्वतंत्र सत्र संमेलनात ठेवण्यात आले आहेत.

...म्हणून शेतकरी साहित्य संमेलन गरजेचे!
प्रा. झाडे यांनी सांगितले की, साहित्य हा समाजाचा आरसा असतो, असे म्हणतात, पण शेती क्षेत्रातील वास्तवतेचे व त्यामागील दाहकतेचे प्रतिबिंब साहित्यात उमटलेले नाही. गेल्या १५-२० वर्षांमध्ये देशात ६ लाखांपेक्षा जास्त शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत, पण त्याची दखल साहित्य क्षेत्राने गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. त्याचे प्रतिबिंब साहित्यात प्रभावीपणे उमटलेले आढळत नाही.

Web Title:  Farmer Sahitya Sammelan from tomorrow in Mumbai