Join us
Daily Top 2Weekly Top 5

कायदा-सुव्यवस्था राखता येत नसेल तर ठाकरेंनी राजीनामा द्या; निवृत्त नौदल अधिकाऱ्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 21:04 IST

उद्धव ठाकरेंच्या सर्व कार्यकर्त्यांनी देशाची माफी मागावी; मदन शर्मांची मागणी

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दलचं एक व्यंगचित्र शेअर केल्यानं शिवसैनिकांनी नौदलाच्या एका माजी अधिकाऱ्याला मारहाण केली. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसैनिकांच्या मारहाणीत जखमी झालेले नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मांनी यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. कायदा-सुव्यवस्था राखता येत नसेल तर त्यांनी त्वरित त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, असं शर्मा म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या सर्व कार्यकर्त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली.मदन शर्मांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांची व्यथा मांडली. 'मी जखमी आहे. तणावात आहे. जे घडलं ते अतिशय दु:खद आहे. मला उद्धव ठाकरेंना एक गोष्ट अतिशय स्पष्ट शब्दांत सांगायची आहे. तुम्हाला कायदा-सुव्यवस्था राखता येत नसेल, तर राजीनामा द्या. ही जबाबदारी कोणाला द्यायची ते लोकांना ठरवू दे,' असं शर्मा म्हणाले. 'अशी घटना घडू नये. उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं देशाची माफी मागायला हवी,' अशी मागणी त्यांनी केली. 

संरक्षणमंत्र्यांचा ठाकरे सरकारला स्पष्ट इशारानौदलातील माजी अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. मदन शर्मा यांना झालेल्या मारहाणीवरून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. माजी सैनिकांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, अशा शब्दांत सिंह यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. सिंह यांनी मदन शर्मा यांच्याशी संवादही साधला आहे. 'माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. माजी सैनिकांवरील अशा प्रकारचे हल्ले निषेधार्ह असून ते कदापि खपवून घेतले जाणार नाहीत,' असं राजनाथ सिंह म्हणाले. 

फडणवीसांकडून ठाकरे सरकारचा समाचार"महाराष्ट्रात राज्यपुरस्कृत दहशतवादाची अवस्था निर्माण झाली आहे. मी ट्विटरद्वारे उद्धव ठाकरेंना हे गुंडाराज थांबवण्याचे आवाहन केलं आहे. निवृत्त नौदल अधिकाऱ्याला अशा प्रकारे मारहाण करणं. लोकांना अटक करणं आणि दहा मिनिटांत सोडून देणं हे चुकीचं आहे" असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. "महाराष्ट्रात यापूर्वी आपण अशा प्रकारचं वातावरण कधीही पाहिलं नाही" असं म्हणत फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याआधीही ट्विट करुन ही घटना अतिशय धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे. केवळ व्हॉट्सअपवर आलेला मेसेज फॉरवर्ड केल्याने माजी नौदल अधिकाऱ्याला या गुंडांनी मारले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अशा घटना रोखल्या पाहिजेत असं म्हटलं होतं. या गुंडावर कठोर कारवाई करुन त्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. 

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा; माजी नौदल अधिकाऱ्याच्या मुलीची मागणीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील एक कथित व्यंगचित्र शेअर केल्याबद्दल माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण झाली. यानंतर मदन यांच्या कन्या शीला शर्मा यांना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. एक मेसेज फॉरवर्ड केल्यानं माझ्या वडिलांना धमक्या येत होत्या. त्यानंतर काही शिवसैनिकांनी माझ्या वडिलांवर हल्ला केला, असं शीला यांनी सांगितलं.

टॅग्स :उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसराजनाथ सिंह