विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरण बाधितांना सानुग्रह अनुदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 05:06 IST2025-05-08T05:05:00+5:302025-05-08T05:06:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विरार-डहाणू रोड रेल्वे चौपदरीकरण व कारशेड बांधण्यासाठी प्रकल्पामधील सर्व्हे न. २१६ आसनगाव येथील ...

विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरण बाधितांना सानुग्रह अनुदान
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विरार-डहाणू रोड रेल्वे चौपदरीकरण व कारशेड बांधण्यासाठी प्रकल्पामधील सर्व्हे न. २१६ आसनगाव येथील कुटुंबे बाधित होत आहेत. सुमारे ३० हेक्टर जागा संपादन करावयाची असून, यामध्ये जे बाधित होतील, त्यांना सानुग्रह अनुदान द्यावे. याबाबत जिल्हा स्तरावर बैठक घेऊन त्याचा अहवाल सादर करा, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
विरार-डहाणू येथील बाधित कुटुंबांसोबत इतर विषयांसंबंधात मंत्रालयात आयोजित बैठकीत बावनकुळे यांनी हे आदेश दिले. बैठकीला आ. मनीषाताई चौधरी, ठाणे आणि पालघरचे जिल्हाधिकारी आदी उपस्थित होते.
रेल्वेसाठी जमीन अधिग्रहित केली जात असताना तेथील लोकांचे पुनर्वसन झाले पाहिजे. जर त्यांची घरे तिथे असतील तर त्याचा सर्व्हे करून त्याचा योग्य मोबदला त्यांना मिळाला पाहिजे. जवळपास त्यांचे पुनर्वसन करता येईल का, याचाही विचार होणे आवश्यक आहे. बाधित कुटुंबाला किमान एक हजार स्क्वेअर फूट जागा उपलब्ध दिली पाहिजे. यासाठी मिहान प्रकल्पामध्ये जे धोरण ठरविले, त्यानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश बावनकुळे यांनी दिले.
गणेश मंदिर ट्रस्टबाबत...
बोरीवली येथील टीपीएस ३ भूखंडाला श्री गणेश मंदिर ट्रस्टचे नाव लावून जागा नियमित करण्यात यावी तसेच, १९७४ च्या नियमावलीप्रमाणे कर आकारणी करावी, अशी मागणीदेखील केली.
याबाबत बावनकुळे यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण झाल्याचे दिसत असून, नियमानुसार किती कर लागू होऊ शकतो, याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.
म्हाडातून ‘त्यांचे’ पुनर्वसन
समुद्राच्या किनाऱ्यावर मच्छीमार समाजासाठी राखीव असलेली जागा गावठाणात समाविष्ट करण्याची मागणी झाली असता, बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, मच्छीमारांची सध्याची जागा ही सीआरझेडमध्ये येत असून, समुद्राच्या कडेला गावठाण करणे शक्य नाही. यासाठी जवळपास जागा पाहून त्याठिकाणी म्हाडाच्या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच जास्तीत जास्त मोबदला कसा देता येईल याबाबतही विचार करू.