मार्च उजाडूनही नाले अजून गाळातच!पावसाळ्यापूर्वी सफाईसाठी पालिकेकडून कंत्राटासाठी अटी शिथिल : महापौरांनी घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 13:26 IST2026-03-14T13:25:46+5:302026-03-14T13:26:16+5:30
दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर पालिकेकडून नालेसफाईची लगबग सुरू होते. मात्र, मागील काही वर्षांत नालेसफाईच्या कामात घोटाळे झाले.

मार्च उजाडूनही नाले अजून गाळातच!पावसाळ्यापूर्वी सफाईसाठी पालिकेकडून कंत्राटासाठी अटी शिथिल : महापौरांनी घेतला आढावा
मुंबई : यंदा मार्च उजाडूनही महापालिकेला मुंबईतील नाल्यांच्या सफाईला मुहूर्त मिळालेला नाही. मागील वर्षी पालिकेने नालेसफाईसाठी दोन वर्षांकरिता कंत्राटदार नेमले होते. मात्र, नालेसफाई व्यवस्थित न झाल्याने काही कंत्राटदारांची देयके पालिकेने दिली नाहीत. तर, काहींची नावे नालेसफाईच्या घोटाळ्यात आल्याने कंत्राटदारांनी नालेसफाईला नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नालेसफाई वेळेत व्हावी, यासाठी काही अटी-शर्थी शिथिल केल्या आहेत. तरीही कंत्राटदार पुढे येत नसल्याने मिठी नदीसह नाल्यांची सफाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर पालिकेकडून नालेसफाईची लगबग सुरू होते. मात्र, मागील काही वर्षांत नालेसफाईच्या कामात घोटाळे झाले. मिठी नदीच्या प्रकरणी चौकशी सुरू आहे. या कारणास्तव मागील वर्षी दोन वर्षांचे कंत्राट देऊनही यंदा वेळेत नालेसफाई सुरू झालेली नाही.
...तर ‘मिठी’ची स्वच्छता पालिकेने स्वत: करावी
महापौर रितू तावडे यांनी शुक्रवारी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आदींची बैठक घेऊन नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतला. मिठी नदीच्या सफाईसाठी कंत्राटदार वेळेत पुढे न आल्यास पालिका प्रशसासने स्वत:च्या यंत्रणेद्वारे करण्याची तयारी ठेवावी, असे निर्देश तावडे यांनी यावेळी दिले.
नाल्यांजवळ डिजिटल डॅशबोर्ड लावण्याचे निर्देश
जेथे नालेसफाईचे काम सुरू आहे, तेथे डिजिटल डॅशबोर्ड लावावा. या बोर्डवर संबंधित नाल्याची लांबी-रुंदी, काढण्यात येणाऱ्या गाळाचे प्रमाण, कामाचा कालावधी, कंत्राटदाराचे नाव आणि संबंधित अभियंत्याचा संपर्क क्रमांक असावा.
तसेच नाल्यातून गाळ काढण्यापासून ते डम्पिंग ग्राउंडपर्यंत त्याच्या विल्हेवाटीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया फोटो आणि व्हिडीओद्वारे नोंदवणे बंधनकारक करावे, जेणेकरून नालेसफाईच्या कामात पूर्ण पारदर्शकता राहील, असेही महापौरांनी स्पष्ट केले.
लोकप्रतिनिधी पाहणी करणार
नालेसफाईच्या कामात पारदर्शकता राखणे अत्यावश्यक आहे. या कामांची सर्व माहिती लोकप्रतिनिधींना द्यावी, असे महापौर रितू तावडे यांनी बैठकीत नमूद केले.
पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाई आणि गाळ काढण्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी सध्या बैठक घेतली जात आहे; मात्र पुढील टप्प्यात अधिकारी आणि लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष कामाची पाहणी करतील.नाल्यांतून काढलेला गाळ ४८ तासांत योग्य पद्धतीने हटवावा. या गाळावर रासायनिक द्रव्यांची फवारणी करून दुर्गंधी आणि प्रदूषण टाळावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.