विकासकामांतही रेल्वेची गती मंदच, सोईसुविधांच्या कामांमुळे अडथळ्यांची शर्यत : कामाचे साहित्य, लोंबकळणाऱ्या वायरींमुळे धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 09:59 IST2026-02-16T09:57:40+5:302026-02-16T09:59:16+5:30
मध्य रेल्वेच्या दादर, भायखळा, तर पश्चिम रेल्वेच्या दादर, ग्रँट रोड, मरिन लाइन्स आदी स्थानकांवरील फलाटाचे छप्पर हटविले आहे. त्यामुळे सध्या उन्हाळ्यात प्रवासी घामाघूम होत आहेत.

विकासकामांतही रेल्वेची गती मंदच, सोईसुविधांच्या कामांमुळे अडथळ्यांची शर्यत : कामाचे साहित्य, लोंबकळणाऱ्या वायरींमुळे धोका
मुंबई : रेल्वे प्रशासनाने स्थानक सुधारणा प्रकल्पांतर्गत नवीन पादचारी पूल, लिफ्ट, सरकते जिने, फलाटांचे छत, लाद्या, १५ डब्यांच्या लोकल थांबण्यासाठी फलाटांचा विस्तार, डिजिटल इंडिकेटर्स बसवणे आदी कामे हाती घेतली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सुरू झालेली ही कामे सुरूच असल्याने प्रवाशांना अरुंद प्लॅटफॉर्म तसेच ट्रेनमध्ये चढता-उतरताना अडथळ्यांचा शर्यत पार करावी लागत आहे. त्यामुळे ही कामे कधी पूर्ण होणार असा सवाल ते विचारत आहेत.
मध्य रेल्वेच्या दादर, भायखळा, तर पश्चिम रेल्वेच्या दादर, ग्रँट रोड, मरिन लाइन्स आदी स्थानकांवरील फलाटाचे छप्पर हटविले आहे. त्यामुळे सध्या उन्हाळ्यात प्रवासी घामाघूम होत आहेत. काही ठिकाणी मोफत पिण्याच्या पाण्याची सुविधा बंद आहे. त्याचबरोबर अस्वच्छ शौचालयांमुळेही प्रवासी हैराण झाले आहेत.
जास्तीतजास्त प्रवाशांना फलाटांवर थांबता यावे, यासाठी मध्यभागी असलेली दुकाने आणि पाण्याची व्यवस्था फलाटांच्या टोकाला स्थालांतरित केली आहे. बंद असलेल्या पाणपोया सुरू केल्या जातील. स्थानकांच्या विकासकामांसाठी छत काढले असेल, तर ते लवकर बसविण्यात येईल.
डॉ. स्वप्निल नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
दादर येथे फलाटाच्या टोकाला पाणपोया
दादर रेल्वे स्थानकातील ९, १०, ११ प्लॅटफॉर्मच्या अगदी टोकाला पाणपोया आहेत. अनेकदा प्रवाशांना पाणी पिण्यासाठी तिथंपर्यंत पोहोचणेही कठीण होत असल्याचे त्यांचे म्हणणे. तर, चिंचपोकळीसारख्या स्टेशनमध्ये नव्याने सुरू करण्यात केलेली पाणपोईही बंद आहे.
शौचालयात अस्वच्छता, दुर्गंधी
चर्चगेट स्टेशनमधील शौचालय आणि त्या बाहेरचा परिसर नेहमीच अस्वच्छ असतो.
सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असल्याने याबद्दल प्रशासनाकडे प्रवाशांनी अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
‘सकाळच्या गर्दीच्या वेळी उन्हात उभे राहणे खूप त्रासदायक ठरते. छप्पर नसल्याने उन्हाच्या झळा सहन कराव्या
लागतात,’ असे दादर स्थानकातून नियमित प्रवासी करणारे सचिन पाटील यांनी सांगितले.
‘पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अनेकदा बंद असते. दादरमध्ये तर ती अगदी फलाटाच्या शेवटच्या टोकाला आहे. त्यामुळे तिथपर्यंत पोहोचणेच अवघड होते. येत्या उन्हाळ्यात तरी किमान पाण्याची सुविधा वाढवायला हवी,’ अशी मागणी पूजा शाह यांनी केली.
काम सुरू असलेल्या भागात फलाट अरुंद झाला आहे. ट्रेन येताना चढताना-उतरताना ढकलाढकली होते, त्यामुळे सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे, असे भायखळा येथील प्रवासी इरफान शेख यांनी नमूद केले.
साहित्य, यंत्रे, जुने पत्रे....
अनेक ठिकाणी कामासाठी विविध साहित्य, यंत्रे आणण्यात आली आहेत. जुने काढलेले पत्रे तिथेच पडून आहेत. लोंबकळणाऱ्या वायरींमुळेही अपघाताचा धोका आहे.